
काटोल येथील कंपनीत झालेल्या स्फोटप्रकरणी मोठी कारवाई; आत्तापर्यंत संचालकांसह 11 जणांना अटक
कळमेश्वर : काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील एसबीएल एनर्जी लिमिटेड कंपनीत झालेल्या शक्तिशाली स्फोटात १९ कामगारांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कंपनीच्या २ संचालकांसह ११ जणांना अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, एकूण २१ आरोपींवर कळमेश्वर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने अटकेतील आरोपींना ६ दिवसांची पोलिस कोठडी मंजूर केली. या प्रकरणात पोलिसांनी कंपनीचे दोन संचालक रवि प्रकाशचंद्र कामरा (रा. रायपूर) आणि राकेश सुदर्शन तिवारी (रा. नागपूर) यांना ताब्यात घेतले असून, त्यांची रिमांड प्रक्रिया सुरू आहे. यापूर्वी अटक केलेल्या ९ आरोपींमध्ये व्हाईस प्रेसिडेंट चंद्रशेखर ब्रिजमोहन रजवाड यांचा समावेश आहे. वरिष्ठ महाव्यवस्थापक संदीप सोळंकी, महाव्यवस्थापक प्रदीप शर्मा, उत्पादन व्यवस्थापक रोशन राऊत, उत्पादन व्यवस्थापक फिलिंग नीलकलाम डोंगरे, उत्पादन पर्यवेक्षक पंकज पांडे, लोडिंग पर्यवेक्षक सुधाकर उपरकर, राजेंद्र पारधी आणि विलास मालवे यांना अटक करण्यात आली आहे.
हेदेखील वाचा : Nagpur Accident: नागपूर जिल्ह्यात स्फोटक कारखान्यात भीषण स्फोट; 15 जणांचा मृत्यू, 18 जखमी
दरम्यान, दारुगोळा आणि अन्य स्फोटक पदार्थांची निर्मिती करणाऱ्यांबाबत केंद्र आणि राज्याचे कायदे आहेत. कायद्यातील तरतूदी तपासाव्या लागतील. नियम आणि कायद्यात कसे संशोधन करावे लागेल, याचा अभ्यास करून केंद्राला शिफारस करू, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
सुरक्षेत होत्या त्रुटी
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, प्रथमदर्शनी कंपनीचा निष्काळजीपणा समोर आला आहे. विस्फोटक निर्मिती युनिटमध्ये सुरक्षा उपायांचे पालन करण्यात पेसो, डिश आणि कामगार आयुक्त कार्यालय अपयशी ठरले आहे, त्यांचीही जबाबदारी निश्चित केली जाईल. त्यांनी कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाईची घोषणा केली. कंपनीतर्फे मृतांच्या वारसांना प्रत्येकी ७५ लाख रुपये तर जखमींना २५ लाख रुपये देण्यात येईल, असे ते म्हणाले.
दोन दिवसांपूर्वी झाला होता स्फोट
नागपूर जिल्ह्यातून दोन दिवसांपूर्वी एक धक्कादायक घटना समोर आली होती. स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट झाला. मोठा स्फोट झाल्याने तिथे भीषण आग लागली. या भीषण आगीत मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याचे समोर आले आहे. जवळपास १५ जणांचा मृत्यू झाला आहे तर १८ जण गंभीर जखमी झाले आहे. तर यातून ४ जण गंभीर जखमी असल्याचे सांगितले जात आहे. ही घटना राऊळगाव, तहसील काटोल येथे घडली. या घटनेमुळे गाव हादरून गेला आहे.