
राज्य सरकारचा मोठा निर्णय! २२ जुलै रोजी अजितदादांची जयंती शासकीय स्तरावर साजरी होणार (Photo Credit- X)
अजितदादांच्या लोकसेवेचा आणि महाराष्ट्राच्या विकासातील त्यांच्या योगदानाचा गौरव व्हावा, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे यासंदर्भात आग्रही मागणी केली होती. या मागणीची तातडीने दखल घेत मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार सामान्य प्रशासन विभागाने अवघ्या २४ तासांत हे परिपत्रक जारी केले.
परिपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, २२ जुलै रोजी राज्यभरात हा शासकीय उपक्रम राबवला जाईल. या दिवशी राज्यातील सर्व शासकीय यंत्रणांच्या कार्यालयांमध्ये त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले जाणार आहे. याशिवाय राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांमध्येही या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांवर या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची संपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
प्रशासनावरील मजबूत पकड, पायाभूत सुविधांचा विकास आणि लोककल्याणकारी योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून शासनाने हा निर्णय घेतला असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.