
प्राथमिक शिक्षकांची ५०० पदे रिक्त! भंडारा जिल्ह्यातील प्रकार; एकाच शिक्षकावर ४ वर्गांची जबाबदारी
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शिक्षणाचा कणा असलेल्या जिल्हा परिषद शाळा सध्या भीषण शिक्षक टंचाईचा सामना करत आहेत. जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांची तब्बल ५०० पदे रिक्त असून एकीकडे नवीन शैक्षणिक सत्राच्या प्रवेशाची तयारी सुरू असताना दुसरीकडे अनेक शाळांमध्ये १ ते ४ वर्गासाठी केवळ एकच शिक्षक उपलब्ध असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.एकाच शिक्षकावर शाळेचा डोलारा जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये विद्याथ्यांची संख्या पुरेशी असतानाही शिक्षकांची संख्या मात्र अत्यल्प आहे. उदाहरणार्थ कोलारी येथे ४४ विद्यार्थ्यांसाठी फक्त १ शिक्षक असून (स्वयंसेवकाचा कार्यकाळ संपला), पळसगाव येथे ४३ विद्यार्थ्यांसाठी १ शिक्षिका आहे. विहीरगाव येथे ४३ विद्यार्थ्यांसाठी १ शिक्षक, पालांदूर येथे चक्क ९२ विद्यार्थ्यांसाठी केवळ १ शिक्षिका कार्यरत आहे. गत शैक्षणिक सत्रात कंत्राटी स्वयंसेवकांच्या मदतीने गाडा हाकला जात होता. मात्र, ३१ मार्च रोजी या स्वयंसेवकांचा कार्यकाळ संपल्याने आता पुन्हा एकाच शिक्षकावर ४ वर्गांचा भार येऊन पडला आहे.(फोटो सौजन्य – istock)
मे महिन्यात ‘पवित्र पोर्टल’ अंतर्गत शिक्षक भरती होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. जिल्ह्यात ५०० शिक्षकांची गरज असल्याने ही भरती प्रक्रिया पार पडल्यास ग्रामीण भागातील शाळांना संजीवनी मिळू शकते.मात्र, जर ही भरती लांबणीवर पडली, तर जिल्हा परिषद शाळा बंद पाडण्याचे हे षड्यंत्र असल्याची भावना सामान्य जनतेमध्ये निर्माण होत आहे.
शाळेत एकच शिक्षक असताना त्यांना बीएलओसारखी अशैक्षणिक कामे देणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्यासारखे आहे, असे मत सुजाण पालकांनी व्यक्त केले आहे. अध्यापनाचे काम सोडून शिक्षक इतर कामांत व्यस्त असल्याने विद्यार्थ्यांच्या पाया कच्चा राहत असून, या शैक्षणिक नुकसानीला नेमके जबाबदार कोण? असा जळजळीत प्रश्न आता पालकांनी उपस्थित केला आहे. शाळेव्यतिरिक्त इतर कामे शिक्षकांवर लादण्यापेक्षा शिक्षणाच्या दर्जाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे.
केवळ लाखनी तालुक्यातच ६० शिक्षकांची पदे रिक्त आहेत. या संदर्भात लोकप्रतिनिधी आणि पालकांनी पंचायत समिती व जिल्हा परिषद प्रशासनाकडे वारंवार दाद मागितली. मात्र, ‘शिक्षक उपलब्ध नाहीत’ असे सांगून बोळवण केली जात आहे, लाखनीचे गटशिक्षणाधिकारी सुभाष बावनकुळे यांनी वरिष्ठ स्तरावर किमान २ शिक्षकांची मागणी केल्याचे स्पष्ट केले असले, तरी प्रत्यक्ष नियुक्ती कधी होणार, याबाबत अनिश्चितता कायम आहे.
जिल्हा परिषद शिक्षकांना केवळ अध्यापनच नाही, तर शासनाच्या आदेशानुसार बीएलओ (मतदार नोंदणी अधिकारी) आणि इतर अशैक्षणिक कामे करावी लागत आहेत. शाळेत एकच शिक्षक असताना त्यांना अशा कामात विद्यार्थ्यांच्या जुंपल्यामुळे अध्यापनाकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे शाळांच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पालकांमध्ये प्रशासनाविरुद्ध प्रचंड संताप व्यक्त होत आहे.