gun (फोटो सौजन्य- pinterest )
‘आता कळलं का माझा हिसका, आता जिवंत सोडत नाही’ असे म्हणत हल्लेखोराने पती- पत्नीवर गोळ्या झाडल्या. दोघे पती- पत्नी गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. हा प्रकार पूर्व वैमनस्यातून सोलापुरातील मोहोळ तालुक्यातील रोपळे येवती मार्गावर घडला.
पुणे महापालिका ‘ॲक्शन मोड’वर; पावसाळ्यापूर्वी काढली जाणार 180 ठिकाणची अतिक्रमणे
शिवाजी जाधव (६५) आणि सुरेखा जाधव (60) असे जखमी दाम्पत्याचे नाव आहे. त्यांच्यावर सोलापुरातील रुग्णालायत उपचार सुरु आहे. दशरथ केरू गायकवाड असे हल्लेखोराचे नाव असून दांपत्यावर गोळीबार केल्यानंतर तो फरार झाला आहे. मोहोळ पोलीस ठाण्यात दशरथ गायकवाड याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून त्याच्या शोधासाठी पोलिसांची दोन पथके पाठवण्यात आली आहेत.
नेमकं काय घडलं ?
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी जाधव आणि सुरेखा जाधव हे दोघे पंढरपूर येथून देव दर्शन करून परत येत होते. तेव्हाच हल्लेखोर दशरथ गायकवाड हा येवती गावाच्या हद्दीत दबा धरून बसलेला होता. हे दांपत्य नजरेच्या टप्प्यात येताच गायकवाड याने त्या दोघांवरही निशाणा धरून सटासट गोळ्या झाडल्या. पिस्तूलामधून गोळ्या मारून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.
पूर्व वैमनस्यातून अपमानाचा बदला
चार वर्षांपूर्वी शिवाजी जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून दशरथ गायकवाड याला मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीनंतर मोठा अपमान झाल्याची भावना आरोपी गायकवाड याच्या मनात होती. चार वर्षे जुन्या वादातून, पूर्व वैमनस्यातून अपमानाचा बदला घेण्यासाठी गायकवाड याने शिवाजी पुंडलिक जाधव, सुरेखा शिवाजी जाधव या पती-पत्नीवर गोळीबार करत त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. ‘आता कळलं का माझा हिसका, आता जिवंत सोडत नाही’ असे म्हणत त्याने सटासट गोळ्या झाडल्या.
प्रकृती चिंताजनक
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सोलापूर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. मोहोळ पोलीस ठाण्यात दशरथ गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दशरथ गायकवाड याचा शोध घेऊन त्याला अटक करण्यासाठीन मोहोळ पोलिसांचे दोन पथक रवाना झालं आहे. दरम्यान शिवाजी जाधव आणि त्यांच्या पत्नी सुरेखा यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून सुरेखा यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.