
जायकवाडी धरणात दोन मित्रांनी गमावला जीव; सुट्टी असल्यामुळे फिरायला गेले अन्...
पैठण : पैठण येथील जायकवाडी धरण परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धरण परिसर पाहण्यासाठी आलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील दोन मित्रांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून एका तरुणाचा मृतदेह शोध पथकाला मिळाला आहे. मात्र रात्रीचा अंधार सुरू झाल्याने दुसऱ्या तरुणाचा शोध तात्पुरता स्थगित करण्यात रविवारी आला होता. या तरुणाचा मृतदेह शोधण्यासाठी सोमवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम राबवण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथील मुकुंदवाडी परिसरातील अंबिकानगर भागात राहणारे सात तरुण रविवारी धरण पाहण्यासाठी व पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पैठण येथे आले होते. यावेळी काही तरुणांना धरणाच्या पाण्यात पोहायचा मोह आवरला नाही. मात्र पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अचूक अंदाज न आल्याने अनिकेत मनू – भारती (वय १९) व संकेत सिद्धार्थ खरात (वय १८) हे दोघे पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले.
सुसाट वाऱ्यामुळे शोधमोहिमेत अडथळे
घटनास्थळी उपस्थित पर्यटकांनी दोघांना वाचविण्याचे प्रयत्न केले. मात्र पाण्याची खोली अधिक असल्याने त्यांना यश आले नाही. दरम्यान, धरण नियंत्रण कक्षामार्फत माहिती मिळताच पैठण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अग्निशामक दलाला पाचारण केले. बचाव पथकाने सुरू केलेल्या शोधमोहीमेदरम्यान संकेत सिद्धार्थ खरात याचा मृतदेह सायंकाळी हाती लागला. मात्र अनिकेत मनू भारती याचा शोध सुरू असतानाच परिसरात अचानक सुसाट वारे सुरू झाले आणि अंधार पडल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली. अनिकेतचा शोध सोमवारी सकाळी पुन्हा सुरू केला आहे.
अग्निशामक दलाचे मदतकार्य
मृत संकेत सिद्धार्थ खरात व बेपत्ता अनिकेत भारती हे दोघेही शिक्षण घेत होते. त्यांच्या अकाली निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी धरण परिसरात मोठी गर्दी केली होती. युवकांच्या मित्रपरिवारातही शोककळा पसरली आहे. यावेळी पोलिस निरीक्षक महादेव गोमारे, सहाय्यक पोलिस निरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पैठण नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाचे जवान जबी धांडे तसेच पोलिस ठाण्याचे जमादार राजेंद्र जिवडे, हवालदार राजेश चव्हाण आदींनी शोधमोहीम राबविली.
धरण परिसरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
धरण परिसरात दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात. मात्र धोकादायक ठिकाणी पोहण्यासाठी उतरणाऱ्या पर्यटकांमुळे वारंवार दुर्घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर धरण परिसरात अधिक कडक सुरक्षा व्यवस्था, चेतावणी फलक आणि पर्यटकांवर नियंत्रणाची मागणी नागरिकांकडून होत आहे.