
15 दिवसांपासून पावसाचा पत्ता नाही; शेवगावच्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ
चालू हंगामाच्या सुरुवातीला तालुक्यात एक ते दोन दिवस किरकोळ स्वरूपात पावसाने हजेरी लावली होती. जमिनीतील तात्पुरता ओलावा पाहून शेतकऱ्यांनी कपाशी लागवडीची घाई केली. पाऊस नियमित पडेल या आशेने हजारो रुपये खर्च करून महागडी बियाणे आणि खते खरेदी केली व पेरणी पूर्ण केली. मात्र, पेरणी होताच पावसाने अचानक दडी मारल्याने शेतकऱ्यांचे संपूर्ण गणित पुरते कोलमडले आहे.
गेल्या दोन आठवड्यांपासून पावसाचा पत्ता नसल्याने आणि कडक ऊन पडत असल्याने शेतातील ओल पूर्णपणे नष्ट झाली आहे. अंकुरलेली कपाशीची कोवळी पिके आता कोमेजू लागली असून पानांवर पिवळकी पडली आहे. कपाशी वाचवण्यासाठी अनेक शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे, मात्र पाण्याच्या उपलब्धतेअभावी डोळ्यांदेखत पिके जळून खाक होत असल्याचे भीषण चित्र आहे.
“सुरुवातीला पाऊस पडल्याने मी मोठ्या आशेने तीन एकर क्षेत्रावर कपाशीची लागवड केली. बियाणे, खते आणि मशागतीसाठी हजारो रुपयांचा खर्च केला आहे. पण १५ दिवस झाले पावसाचा थेंबही नाही. पिके डोळ्यांसमोर वाळत चालली आहेत. आता पुन्हा पाऊस आला तरी ही पिके वाचतील की नाही यावर शंका आहे. शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.”, शेवगाव पीडित शेतकरी यलप्पा कुसळकर यांनी माहिती दिली.
शेवगाव तालुक्यात कापूस हे मुख्य पीक मानले जाते. जर पुढील दोन-तीन दिवसांत दमदार पाऊस झाला नाही, तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येणार हे आता निश्चित झाले आहे. आधीच कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्याला आता पुन्हा बियाणे आणि खतांसाठी पैसे कुठून आणायचे, हा मोठा प्रश्न सतावत आहे. पुढील २४ ते ४८ तासांत पाऊस न झाल्यास तालुक्यातील शेती अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.