File Photo : AAP
मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यानुसार, विविध पक्षांकडूनही तयारीही केली जात आहे. असे असताना आता आम आदमी पक्ष (AAP) मुंबईतील सर्व 36 जागांवर उमेदवार उभे करणार असल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत चांगलीच रंगत येणार आहे.
आम आदमी पक्षाच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी राज्यातील सरकारवर टीका केली. त्या म्हणाल्या, ‘खोके सरकारकडे लोककल्याणकारी कामासाठी वेळ नाही. राज्याच्या तिजोरीची एकत्रितपणे लूट करण्यात सरकार व्यस्त आहे. खोके सरकारकडे लोकहितासाठी शून्य राजकीय इच्छाशक्ती आहे आणि त्याऐवजी ते केवळ भ्रष्टाचारातच व्यस्त आहेत. कारण त्यांना खात्री आहे की ते सत्तेत पुन्हा येणार नाहीत’.
तसेच एकनाथ शिंदे सरकार हे राज्याच्या तिजोरीची एकत्रितपणे लूट करण्याशिवाय दुसरे काही करत नाही. भाजप-शिंदे सेनेने केवळ राज्यघटनेची फसवणूक केली नाही. सध्याच्या भाजप-शिंदे सेनेच्या नेतृत्वाखालील बेरोजगारी आणि महागाईने आम आदमीचे कंबरडे मोडले आहे. कृषी संकट आणि संबंधित शेतकरी आत्महत्या सुरू आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.
मुंबईतील सर्व जागा लढवणार
आम आदमी पक्ष मुंबईतील सर्व 36 जागांवर उमेदवार उभे करणार आहे. आम आदमी पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, लोकचळवळीतून उदयास आलेला पक्ष आज दिल्ली आणि पंजाबमध्ये सत्तेवर आहे. आमचे गोवा आणि गुजरातमध्ये आमदार आहेत आणि संसदेत खासदारांची संख्या लक्षणीय आहे, अशी माहितीही प्रीती शर्मा मेनन यांनी यावेळी दिली.