Bombay High Court लिपिक टायपिंग परीक्षेत गोंधळ; संभाजीनगरात विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन
Bombay High Court लिपिक पदाच्या टायपिंग परीक्षेदरम्यान राज्यभरात गोंधळाचे चित्र पाहायला मिळाले. 16 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. मात्र, अनेक ठिकाणी तांत्रिक अडचणी आणि परीक्षा व्यवस्थेबाबत विद्यार्थ्यांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले.
परीक्षेदरम्यान आलेल्या अडचणींमुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला. काही केंद्रांवर परीक्षा सुरळीत पार पडली नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे असून, संबंधित यंत्रणेने या प्रकाराची चौकशी करून परीक्षा पुन्हा घ्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
छत्रपती संभाजीनगरातील परीक्षा केंद्रावरही विद्यार्थ्यांनी आपला संताप व्यक्त करत रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू केले. परीक्षा पुन्हा आयोजित करावी आणि तांत्रिक अडचणींची पुनरावृत्ती होणार नाही, याची खात्री द्यावी, अशा मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या.
मनोज जरांगे पाटील यांचा 29 ऑगस्टच्या आंदोलनाचा निर्धार; ‘जीव गेला तरी चालेल, आंदोलनावर ठाम’
या आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी परीक्षा केंद्रावर जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली. त्यांनी विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेत त्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवला. दीपके यांनी विद्यार्थ्यांना आंदोलन सुरू ठेवण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलनातून माघार घेऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अभिजीत दीपके यांनी परीक्षा पुन्हा घेण्याचे स्पष्ट आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचे आवाहन केले. ‘मीदेखील तुमच्यासोबत असेल. आता हेच जंतर-मंतर,’ अशी भूमिका त्यांनी मांडली. काही दिवसांपूर्वी दिल्ली दौऱ्यावर असताना दीपके यांनी लवकरच ‘जंतर-मंतर सीझन 2’ सुरू करण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर संभाजीनगरातील आंदोलनात सहभागी होत त्यांनी या भूमिकेला प्रत्यक्ष सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.
राज्यातील ज्या-ज्या परीक्षा केंद्रांवर तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी केंद्रावरच बसून राहावे, असे आवाहनही दीपके यांनी केले. आता विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर संबंधित परीक्षा यंत्रणा काय निर्णय घेते आणि पुनर्परीक्षेबाबत कोणती भूमिका घेतली जाते, याकडे राज्यातील उमेदवारांचे लक्ष लागले आहे.
‘दिमागी नक्षलवाद’च्या टीकेवरून फडणवीस-सपकाळ आमनेसामने; सोनिया गांधींच्या व्हिडिओवरून राजकारण तापले