
नगर तालुक्यातील बहिरवाडी, ससेवाडी, इमामपूर गावांची तहान भागवण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. डोंगर उतारावरील विविध गावांमधील विहिरी, कूपनलिका कोरड्याठाक पडल्या असून सर्वच जलस्रोत बंद झाले आहेत. त्यामुळे पाणीटंचाईच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागत आहेत.
भोयरे पठार गावचा टँकरसाठी प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील विविध गावे गर्भगिरीच्या डोंगर उतारावर वसलेली आहेत. अशा गावांमध्ये पावसाच्या सुरुवातीलाच भूजल पातळी वाढते तर उन्हाळ्याच्या
सुरुवातीलाच भूजल पातळी झपाट्याने खालावून पाणीटंचाई जाणवू लागते. इमामपूर, बहिरवाडी, ससेवाडी या गावांसह ठराविक गावांना दरवर्षीच उन्हाळ्यात टँकरवर अवलंबून राहावे लागते. या तीन गावांना १० एप्रिलपासून टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे. भोयरे पठार गावचा पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करण्याचा प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल झाला आहे.
Ahilyanagar News: साकळाई योजनेला वादाचे ग्रहण! घोड धरण लाभक्षेत्रातील शेतकरी उतरले रस्त्यावर
यंदा तालुक्यात अतिवृष्टीने धुमाकूळ घातला होता. सर्व नद्या-नाल्यांना महापुराची परिस्थिती निर्माण झाली होती. तालुक्यातील सर्वच तलाव, नाले, बंधारे तुडुंब भरले होते. तरीदेखील पिण्याच्या पाण्यासाठी उन्हाळ्यात टँकर सुरू करावे लागले आहेत.
जलसंधारणाची मोठ्या प्रमाणात कामे झाली आहेत. अनेक नद्या, ओढ्यांवर बंधारे बांधण्यात आले आहेत. तालुका टँकरमुक्त करण्यासाठी ‘पाणी आडवा, पाणी जिरवा मोहीम गावोगावी सक्रियपणे राबवण्याची गरज आहे, भौगोलिक संरचनेनुसार डोंगर उतारावर वसलेल्या गावांना पाणीटंचाईच्या झळा जाणवत्तात है वास्तव आहे. अशा गावांमध्ये पशुधनाच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण होतो. जेऊर परिसरातील वाड्यावस्त्यांवरही पाणीटंचाईची समस्या जाणवू लागली असून येथेही लवकरच टँकर सुरू करावे लागतील, अशी परिस्थिती आहे.
आणखी काही गावांचे टँकरसाठी प्रस्ताव दाखल होण्याची चिन्हे आहेत. गावात नद्यांचे तसेच ओढ्यांचे खोलीकरण करणे, तलावातील गाळ उपसा, तलाव, बंधारे दुरुस्ती करून गळती बंद करणे, वृक्ष लागवड करणे, पाणी आडवा पाणी जिरवा मोहीम मोठ्या प्रमाणात राबवणे, पाण्याचा वापर जपून करणे अशा योजना गावोगावी प्रभावीपणे राबविल्या गेल्यास तालुका टैंकर मुक्त होण्यास निश्चितपणे मदत होईल.