
फोटो सौजन्य: Gemini
श्रीगोंदे येथे पोहण्यासाठी गेलेला तरुण दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याने आणि त्याच्या शोधकार्यासाठी प्रशासनाकडून योग्य सहकार्य मिळत नसल्याचा आरोप करत नातेवाईक आणि ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या निषेधार्थ बेपत्ता तरुणाच्या नातेवाईक महिलांनी कालव्यात उड्या घेत जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर मात्र पोलिस आणि प्रशासन खडबडून जागे झाले.
पिंपळगाव पिसा येथील हंगा जलसेतू कुकडी कालव्यात पोहण्यासाठी गेलेला गणेश जाधव हा तरुण दोन दिवस उलटल्यानंतरही बेपत्ता आहे. त्याचा अद्याप कोणताही थांगपत्ता लागलेला नाही. ग्रामस्थांनी सांगितले की, या घटनेबाबत आमदार आणि खासदारांशी संपर्क साधूनही प्रशासनाकडून अपेक्षित मदत मिळाली नाही. त्यामुळे ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, ग्रामस्थांनी स्वतःच बोट आणून कालव्यात उतरून तरुणाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र कालवा भरून वाहत असल्याने आणि पाण्याचा प्रवाह वेगाने सुरू असल्यामुळे शोधकार्यात मोठा अडथळा निर्माण होत आहे.
कुकडी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी कालव्याचे पाणी बंद करण्यास असमर्थता दर्शवल्याने संतप्त झालेल्या बेपत्ता तरुणाच्या नातेवाईक महिलांनी वैतागून कालव्यात उड्या घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. घटनास्थळी उपस्थित बेलवंडी पोलिस आणि ग्रामस्थांनी तत्परता दाखवत या महिलांना पाण्यातून बाहेर काढले.
या घटनेनंतर कुकडी पाटबंधारे विभागाने परिस्थितीची गंभीर दखल घेत अखेर कालव्याचे पाणी विसापूर धरणाकडे वळवले. त्यामुळे पाण्याचा प्रवाह काही प्रमाणात कमी झाला असून आता बेपत्ता तरुणाचा शोध घेणे सोपे होणार असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, संगमनेर तालुक्यातील बोराटे वस्ती परिसरात शेततळ्यात पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. मृत शेतकऱ्याचे नाव पाराजी धोंडीबा देवगिरे (वय ५०) असे असून ते साकूर येथील देवगिरे वस्तीवर वास्तव्यास होते. बोराटे वस्ती परिसरात त्यांची शेती असून त्यांनी अलीकडेच शेतीसाठी शेततळे तयार केले होते.
रविवारी सकाळी ते कामानिमित्त शेततळ्याकडे गेले असताना पाय घसरून ते पाण्यात पडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. बराच वेळ झाला तरी ते घरी परतले नसल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला. शेततळ्यावर पाहणी केली असता त्यांचा मृतदेह पाण्यात आढळून आला.
त्यांना तातडीने साकूर येथील खासगी दवाखान्यात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच घारगाव पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक गांधले यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पुढील तपास सुरू असून मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
पाराजी देवगिरे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे साकूर परिसरात शोककळा पसरली आहे.