
Rohit Pawar Press Conference: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात आम्ही काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेतली होती. त्यानंतर तपास यंत्रणांना या घटनेचा तपास सुरू केला. याचे समाधान आहे. पण ज्या गतीने हा तपास सुरू आहे. त्यावरून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अजित पवार यांच्या विमानातील इंधनाच्या टाक्या पूर्ण भरण्याची काय गरज होती. असा सवाल रोहित पवार यांनी विचारला आहे. रोहित पवार यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत अजित पवार यांच्या अपघात आणि VSR विमान कंपनीच्या कारभारासंदर्भात प्रश्न उपस्थित केले आहेत.
अजित पवार विमानाची इंधन टाकी आणि पंखांमधील टाक्या पूर्णपणे का भरल्या असा प्रश्न उपस्थित केला. त्यांनी ब्लॅक बॉक्स जळाल्याच्या सिद्धांतालाही आव्हान देत पवार म्हणाले की, तज्ञांच्या मते, ब्लॅक बॉक्स ११०० अंश सेल्सिअस तापमानात एक तास जळाला तरच त्याचे नुकसान होऊ शकते, तसेच, तो महिनाभर पाण्यात बुडाला तरीही राहू शकतो. मग जर विमानाच्या कमी वितळणाऱ्या केबल्स जळल्या नाहीत तर ब्लॅक बॉक्सचे नुकसान कसे होऊ शकते? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
रोहित पवार म्हणाले की, २८ जानेवारीला बारामतीत कमी दृश्यमानता असतानाही वैमानिक सुमित कपूर याने विमान माघारी न वळवता खाली उतरवले. वैमानिकाने विमानाचा स्फोट घडवण्यासाठीच विमान मुद्दामहून खाली आदळले. असा खळबळजनक आरोप रोहित पवार यांनी केला आहे. बारामतीहून हे विमान हैदराबादला जाणार होते, तिथेही विमानात पुन्हा इंधन भरता आले असते. पण हे विमान सुरतहून मुंबईला येत असतानाच या विमानाच्या इंधनाच्या टाक्या पूर्ण भरण्यात आल्या होत्या. बारामतीत विमान अपघाताच्या वेळी या विमानात ३००० ते ३५०० लीटर इंधन होते. धक्कादायक म्हणजे या विमानाच्या टॉयलेटजवळही इंधनाचे जास्तीचे कॅन ठेवण्यात आले होते. त्यामुळे पायलटचा वापर करून हा विमान अपघात घडवण्यात आल्याचा आम्हाला शंका आहे. विमानात इंधनाचा साठा जास्त असेल तर हा मोठा स्फोट होऊ शकतो, हा आमचा संशय खरा ठरत असल्याचे दिसत आहे. बारामतीत त्या दिवशी दृश्यमानता कमी असतानाही पायलट सुमित कपूरने विमान माघारी फिरवले नाही आणि एक हवेत गिरकी घेऊ मुद्दामहून खाली पाडले आणि स्फोट घडवून आणला. (Ajit Pawar Plane Crash )
त्या दिवशी बारामतीत दृश्यमानता कमी असताना पायलटने त्याचे विमानाचे लँडिंग करायलाच नको होते. पण त्यानंतरही त्याने विमानाचे जबरदस्ती लँडिंग केले, त्यामुळे घातपाताचा संशय अधिक बळावतो. असंही रोहित पवार यांनी म्हटले आहे.
यावेळी रोहित पवार यांनी VSR कंपनीच्या कारभारावरही आरोप केले आहेत. व्हीएसआर विमान कंपनीचा एक हँडलर मुंबईतही बसतो. तो फ्लाईट प्लॅनमध्ये बदल किंवा फेरफार करू शकतो. सध्या अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास सुरू आहे. पण व्हीएसआर कंपनीकडून कागदपत्रे मिळवण्याबाबत विलंब होत आहे. व्हिएसआर कंपनीकडून सध्या कागदपत्रांमध्ये फेरफार केले जात आहेत, दिल्लीवरून फ्लाईट प्लॅन आल्यानंतर मुबंईत बसणाऱ्या गोपी नावाच्या हँडलरने त्यात बदल केले असावेत, त्यासाठी त्या दरम्यान करण्यात आलेल्या इ-मेलचीही चौकशी झाली पाहिजे, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.