
अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यात पावसाने फिरवली पाठ; उमा प्रकल्पामध्ये केवळ 4 टक्के जलसाठा;
अकोला : मूर्तिजापूर तालुक्यात यंदाच्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने उमा मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा चिंताजनक स्थितीत पोहोचला आहे. जलसंपदा विभागाच्या उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार, धरणात केवळ ४.५९ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. परिसरात दिवसभर पावसाची एकही मिलिमीटर नोंद न झाल्याने धरणातील पाणीपातळीत कोणतीही वाढ झालेली नाही. त्यामुळे भविष्यात पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता असून शेतकरी चिंतेत आहेत.
सध्या उमा प्रकल्पाची जलपातळी ३३५.८० मीटर असून, धरणात ०.५३६ दशलक्ष घनमीटर इतका एकूण पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा केवळ ४.५९ टक्के राहिला आहे. चालू पावसाळ्यात आतापर्यंत प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात केवळ १० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाअभावी धरणात नवीन पाण्याची आवक झालेली नाही. धरणाचा सांडवा पूर्णपणे बंद असून, सध्या कोणताही पाणीविसर्ग सुरू नाही. धरणाचे सर्व दरवाजे बंद ठेवण्यात आले असून विसर्गाचा वेग शून्य घनमीटर प्रति सेकंद आहे.
उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन जलसंपदा विभागाकडून करण्यात येत आहे. यंदा जून महिन्यापासूनच पावसाने दडी मारल्याने तालुक्यातील खरीप पिकांवरही परिणाम झाला आहे. तालुक्यात आतापर्यंत सरासरीच्या केवळ ३६ टक्के पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून, सिंचनासाठी आवश्यक पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. उमा प्रकल्पावर परिसरातील अनेक गावांसह लंघापूर ५७ खेडी ग्रामीण पाणीपुरवठा योजना आणि सिंचन व्यवस्था अवलंबून आहे. त्यामुळे आगामी काळात दमदार पाऊस न झाल्यास जलसाठा झपाट्याने कमी होऊन पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे लागू शकते.
सिंचनासह ५७ गावांच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न
११.६८ दशलक्ष घनमीटर पाणी साठवण क्षमता असलेल्या उमा प्रकल्पावर लंघापूर ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत ५७ खेडी अवलंबून आहेत. याशिवाय तालुक्यातील पिंपळशेंडा आणि शिवण हे दोन लघुप्रकल्पही कमी पाणीसाठ्यामुळे अडचणीत आहेत. त्यामुळे उमा प्रकल्पातील घटता जलसाठा हा पिण्याच्या पाण्यासह सिंचनासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. जलसंपदा विभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उमा प्रकल्पातील जलसाठ्यात होऊ शकते वाढ
येत्या काही दिवसात चांगला पाऊस झाल्यास उमा प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ होऊन पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न; दमदार पाऊस न झाल्यास पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. तसेच रब्बी हंगामातील सिंचनावरही त्याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विहिरी व बोअरवेलच्या पाणीपातळीत आणखी घट झाल्यास ग्रामीण भागातील पाणीटंचाईचे संकट गंभीर होऊ शकते.