
पावसाचे पुनरागमन खरीप पिकांसाठी संजीवनी; 26.5 टक्के पावसाची अद्यापही तूट कायम
अकोला : सुमारे १६ ते १७ दिवसांच्या विश्रांतीनंतर अकोला जिल्ह्यात पावसाने पुन्हा हजेरी लावली असून, गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम ते मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. खरीप पिकांना या पावसाचा फायदा होत असला, तरी जिल्ह्यात अद्यापही सरासरीच्या तुलनेत पावसाची लक्षणीय तूट कायम आहे.
जिल्ह्यात बुधवारी सकाळी १० वाजेपर्यंतच्या २४ तासात सरासरी २९.१ मिमी पावसाची नोंद झाली. यामध्ये पातूर तालुक्यात सर्वाधिक ४१.७ मिमी, तर बार्शी, टाकळी तालुक्यात ४०.४ मिमी पाऊस झाला. मंगळवारी झालेल्या पावसामुळे पिकांना काहीसा आधार मिळाला असला, तरी हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, यंदाचा पाऊस अजूनही सरासरीपेक्षा आणि गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी आहे. जून महिन्यापासून आतापर्यंत जिल्ह्यात २९५.३ मिमी पावसाची अपेक्षा होती; मात्र प्रत्यक्षात २१७.१ मिमी पावसाचीच नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सरासरीच्या केवळ ७३.५ टक्के पाऊस झाला असून, २६.५ टक्के पावसाची तूट कायम आहे.
दरम्यान, जून ते सप्टेंबर या कालावधीतील ६९३.७ मिमी मोसमी पावसाच्या सरासरीपैकी आतापर्यंत केवळ ३१.३ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीप पिकांच्या वाढीसह धरणे, पिण्याच्या पाण्याची परिस्थिती सुधारण्यासाठी जिल्ह्याला अजूनही दमदार पावसाची आवश्यकता असल्याचे चित्र आहे.
शेतकरी राजा चिंतेत
चालू खरीप हंगामात अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी हवामानाच्या लहरीपणाशी सामना करत पेरण्यांचा वेग कायम ठेवला आहे. कृषी विभागाने दिलेल्या ताज्या अहवालानुसार, जिल्ह्यात आतापर्यंत ७९.३८ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. जिल्ह्याचे खरिपाचे एकूण सरासरी क्षेत्र ७१६२०९ हेक्टर असून, त्यापैकी ५६८५०० हेक्टर क्षेत्रावर पेरणीची कामे मार्गी लागली आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाने दिलेली ओढ आणि उघाडीमुळे पिकांची वाढ काही प्रमाणात खुंटली असून, शेतकरी राजा चिंतेत सापडला आहे. पावसाचा हा खंड असाच लांबल्यास पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Jogeshwari News: जोगेश्वरीत FDA ची धडक कारवाई; १०.९४ लाखांचा विनालेबल साबण जप्त