
Akshaya Tritiya निमित्त जैन मंदिरात धार्मिक कार्यक्रमांची भक्तिमय सांगता
सोलापूर : जैन धर्मातील अत्यंत पवित्र व अध्यात्मिक उन्नतीसाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या अक्षय तृतीया पर्वानिमित्त डब्ल्यू.आय.टी. जैन टेंपल येथे विविध धार्मिक कार्यक्रम भक्तिभावपूर्ण वातावरणात उत्साहात झाले. पहाटे श्री जिनेंद्र भगवानांच्या अभिषेकाने सोहळ्याची मंगल सुरुवात झाली. शांती मंत्र, मांगलिक उद्बोधन आणि भजनांच्या मधुर स्वरांनी संपूर्ण परिसर आध्यात्मिक उर्जेने भारावून गेला. या सर्व उपक्रमांमधून श्रद्धा, संयम आणि त्याग यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला असून, अक्षय तृतीया हा आहार अर्पणातून आत्मशुद्धीचा संदेश देणारा पवित्र पर्व असल्याचे प्रकर्षाने अधोरेखित झाले.
या प्रसंगी प.पू. निर्यापक श्रमण मुनिश्री १०८ वीरसागरजी महाराज यांच्या प्रभावी प्रवचनाने कार्यक्रमाला विशेष उंची प्राप्त झाली. “अक्षय म्हणजे कधीही न संपणारे पुण्य, जे त्याग, सद्गुण आणि परोपकाराच्या भावनेतून आत्म्यात साठते,” असे सांगत त्यांनी जैन तत्त्वज्ञान स्पष्ट केले. जैन धर्मात सेवा ही केवळ सामाजिक कृती नसून ती आत्मशुद्धीची गूढ प्रक्रिया आहे, असे त्यांनी नमूद केले. विशेषतः आहार अर्पण हे सर्वश्रेष्ठ मानले जाते, कारण ते संयम व त्याग स्वीकारलेल्या मुनिश्रींना समर्पित केले जाते, असे त्यांनी अधोरेखित केले.
“मनुष्य जसा पाप करताना आनंद अनुभवतो, तसाच आनंद सेवा करतानाही अनुभवला पाहिजे,” असे सांगत त्यांनी रौद्र ध्यान, हिंसानंद, परिग्रहानंद आणि चौर्यानंद या अशुभ भावनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. करुणा, समत्व आणि अपरिग्रह या जैन मूल्यांचा स्वीकार केल्यास आत्मकल्याणाचा मार्ग सुकर होतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी मुनिश्री धवल सागर महाराज यांनी ‘श्री आदिनाथ पुराण’ वाचनाचे महत्त्व सांगितले, तर मुनिश्री विशाल सागर महाराज यांनी ‘अक्षय’ संकल्पनेचा आध्यात्मिक अर्थ स्पष्ट करत निःस्वार्थ भावनेचे महत्त्व अधोरेखित केले.
मुनिश्रींच्या आहाराचा पावन सोहळा, तसेच पादप्रक्षालन व शास्त्र अर्पण कार्यक्रमही भावपूर्ण वातावरणात पार पडले. बेंगळुरू, पुणे, सांगली, बेळगाव, औरंगाबाद आदी ठिकाणांहून आलेल्या भाविकांनी श्रद्धाभावाने आहार अर्पण करून आत्मिक समाधानाचा अनुभव घेतला. स्व. भाऊसाहेब गांधी जन्मशताब्दी वर्षानिमित्त वालचंद शिक्षण समूहातर्फे आयोजित या उपक्रमामुळे संपूर्ण परिसरात भक्तिभाव, शिस्त आणि अध्यात्मिक जागृतीचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला.
Mira Bhayander : शिवसेनेला धक्का देण्यासाठी भाजपचा ‘जनता दरबार ; मेहता-सरनाईक संघर्ष शिगेला