
अवैध प्रवासी वाहतुकीला लगाम; २० दिवसांत ₹१.६५ कोटींचा दंड, ८,८३९ वाहनांवर कारवाई
या विशेष मोहिमेदरम्यान राज्यभरात एकूण ८ हजार ८३९ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. विविध यंत्रणांच्या संयुक्त कारवाईतून ₹ १ कोटी ६५ लाख २१ हजार ३१५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून, नियमांचे उल्लंघन करणारी १९५ वाहने जप्त करण्यात आली आहेत.
एसटी बसस्थानके ही दररोज लाखो प्रवाशांच्या सुरक्षित आणि सुलभ प्रवासाचा महत्त्वाचा केंद्रबिंदू आहेत. मात्र, बसस्थानक परिसरात होणाऱ्या अवैध वाहतूकीमुळे वाहतूककोंडी, अनिर्बंध वाहतूकीमुळे प्रवाशांच्या सुरक्षितते बरोबरच मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही बाब गंभीर होती. याच पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संयुक्त कारवाईचे स्पष्ट निर्देश दिले होते.
या मोहिमेमुळे बसस्थानक परिसरातील वाहतूक व्यवस्थेत शिस्त निर्माण होण्यास मदत झाली असून प्रवाशांसाठी अधिक सुरक्षित आणि सुकर वातावरण उपलब्ध होत आहे. अवैध पार्किंगला कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी अशा संयुक्त मोहिमा यापुढेही अधिक प्रभावीपणे आणि सातत्याने राबविण्यात येणार आहेत. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
एसटी महामंडळाने सर्व वाहनधारकांना आवाहन केले आहे की, बसस्थानक परिसरातील वाहतुकीची शिस्त आणि प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन आपली वाहने केवळ अधिकृत पार्किंगच्या ठिकाणीच उभी करावीत आणि या जनहिताच्या मोहिमेला सहकार्य करावे.
“प्रवाशांची सुरक्षितता आणि बसस्थानक परिसरातील शिस्त हीच आमची प्राथमिकता” या भूमिकेतून अवैध वाहतूकीविरोधातील ही मोहीम अधिक व्यापक स्वरूपात पुढेही सुरू राहणार असल्याचे प्रतिपादन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.