
मुंबई : नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणामुळे देशभरातील विद्यार्थी संतप्त असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत आंदोलन सुरू आहे. मात्र, या आंदोलनाबाबत माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी “धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची गरज नाही, विद्यार्थीच दहशतवादी आहेत,” असे केलेले वक्तव्य अत्यंत निषेधार्ह असून ते सत्तेच्या अहंकाराचे प्रतीक आहे. सदाभाऊ खोत हे आता ‘सदाभाऊ’ नसून ‘गुंडाभाऊ’ झाले आहेत. विद्यार्थ्यांना दहशतवादी म्हणणाऱ्या सदाभाऊ खोत यांनी तातडीने जाहीर माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली.
सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याचा समाचार घेत अतुल लोंढे म्हणाले, ‘सदाभाऊ ते गुंडाभाऊ’ हा प्रवास तुम्ही इतक्या लवकर पूर्ण कराल, असे कधी वाटले नव्हते. पुन्हा मंत्रिपद मिळवण्यासाठी शेतकरी, गरीब आणि सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या आपल्या भूमिकेलाच तुम्ही तिलांजली दिली आहे. आज शिक्षणाच्या हक्कासाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांनाच तुम्ही गुंड आणि दहशतवादी म्हणत आहात. त्याचबरोबर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देण्याची गरज नाही, अशी भूमिका घेत आहात. दुसऱ्यांच्या मुलांवर लाठ्या-काठ्यांचा मारा होत असताना त्याचे समर्थन करून मंत्रिपद मिळवण्याचा प्रयत्न करणे, हे अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे.
आम्ही पाहिलेले सदाभाऊ आणि आजचे ‘गुंडाभाऊ’ यांच्यात जमीन-आस्मानाचा फरक आहे. विद्यार्थ्यांना दहशतवादी म्हणणे हा त्यांच्या लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या संघर्षाचा आणि घटनात्मक अधिकारांचा अवमान आहे. त्यामुळे सदाभाऊ खोत यांनी आपल्या वक्तव्याबद्दल देशातील विद्यार्थ्यांची बिनशर्त जाहीर माफी मागावी असे लोंढे म्हणाले.
दिल्लीतील सुरू असलेल्या CJP आंदोलनावर शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी आंदोलनकर्त्यांचा उल्लेख “आतंकवादी” असा केल्यानंतर या वक्तव्यावर आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांकडूनही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी सदाभाऊ खोत यांच्या विधानाचा निषेध करत सरकारवरही गंभीर आरोप केले आहेत. आंदोलनात सहभागी असलेल्या काही विद्यार्थ्यांनी माध्यमांशी बोलताना, सरकारविरोधात आवाज उठवणाऱ्यांना “दहशतवादी” ठरवण्याची प्रवृत्ती चुकीची असल्याचे म्हटले. आंदोलनात सहभागी झालेले विद्यार्थी हे देशाच्या विविध भागांतून शिक्षणाशी संबंधित मागण्यांसाठी शांततेच्या मार्गाने एकत्र आल्याचा दावा त्यांनी केला.
हे सुद्धा वाचा : अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव