
विठुरायाचे दर्शन होणार सुलभ! वारकऱ्यांची सोय; १२९.४८ कोटींचे दर्शन मंडप व नवीन स्काय वॉक
श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी राज्यभरातून तसेच देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या लाखो भाविकांच्या सुविधेसाठी राज्य शासनाच्या वतीने १२९.४८ कोटी रुपये खर्चुन अत्याधुनिक दर्शन मंडप आणि नवीन स्काय वॉक उभारण्यात येत आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या पाया खोदाईच्या कामाला वेग आला असून, काम पूर्ण झाल्यानंतर टोकन पद्धतीने नियोजित वेळेत दर्शनाची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे भाविकांना तासनतास रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नसून, कमी वेळेत श्री विठ्ठल-रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन घेणे शक्य होणार आहे.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)
Ashadhi Wari 2026: वारकऱ्यांनो आळंदीत येऊ नका! इंद्रायणीला महापूर, देवस्थानचे आवाहन
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात चैत्र, आषाढी, कार्तिकी आणि माघ यात्रांसह वर्षभरात एक कोटींहून अधिक भाविक दर्शनासाठी येतात. विशेषतः यात्राकाळात लाखो वारकरी आणि भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने दर्शनासाठी अनेक तास प्रतीक्षा करावी लागते. सध्या मंगळवेढा रस्त्यालगत उभारलेल्या तात्पुरत्या पत्राशेडमधील दर्शनबारीचा वापर केला जात असून, तेथील सुविधा अपुऱ्या पडत आहेत.यामुळे राज्य शासनाने सर्व आधुनिक सुविधांनी सुसज्ज कायमस्वरूपी दर्शन मंडप उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील दर्शन व्यवस्थेत मोठा बदल होणार आहे. टोकन पद्धतीमुळे भाविकांना निश्चित वेळेत दर्शनाची सुविधा मिळणार असून, रांगेत तासनतास थांबण्याची गरज कमी होईल. नवीन दर्शन मंडप आणि आधुनिक स्काय वॉकमुळे गर्दीचे नियोजन अधिक प्रभावी होणार असून, भाविकांचा प्रवास सुरक्षित, सुलभ आणि वेळेची बचत करणारा ठरणार आहे. यात्राकाळातील वाढत्या गर्दीचा ताण कमी करण्यासही या प्रकल्पाची महत्त्वाची भूमिका राहणार आहे.