
विठ्ठल भक्तांसाठी मोठी आनंदवार्ता! (Photo Credit- X)
सन 2026 मधील आषाढी एकादशी शनिवार, दि.25 जुलै रोजी होत असून पहाटे 2.20 वाजता मुख्यमंत्री आणि मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा पार पडणार आहे. यंदाची आषाढी यात्रा दि.15 ते 29 जुलैदरम्यान होणार असून त्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीची महत्त्वपूर्ण बैठक भक्तनिवास येथे पार पडली.
सभेत आषाढी यात्रेच्या नियोजनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. दर्शनरांग नियोजन, लाईव्ह दर्शन, सुरक्षा, स्वच्छता, पिण्याचे पाणी, निवास व्यवस्था, अन्नछत्र यांसह भाविकांच्या सोयी-सुविधांवर विशेष चर्चा झाली.
दरम्यान, जतन-संवर्धन कामांतर्गत श्री महालक्ष्मी मंदिर आणि श्री व्यंकटेश मंदिर येथे मूर्ती प्राणप्रतिष्ठा करून जुलै महिन्यात ही मंदिरे भाविकांसाठी खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आषाढीपूर्वी भक्तांना आणखी दोन मंदिरांचे दर्शन लाभणार आहे.
याशिवाय मंदिराचे मूळ स्वरूप अबाधित राखण्यासाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. “श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार” यंदाही देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
सभेत सन 2026-27 च्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली. तसेच “जगद्गुरू अभंग गाथावन” आणि “श्री ज्ञानेश्वरी तपोवन” या पर्यावरण संवर्धन अभियानांत मंदिर समितीचा सहभाग निश्चित करण्यात आला.
भक्तनिवासातील 5 व 8 बेडच्या खोल्या वातानुकूलित करणे, 24 तास गरम पाण्यासाठी हिट पंप यंत्रणेचे अद्यावतीकरण, तसेच अधिकृत मठांमध्ये शौचालय उभारणीचे निर्णयही बैठकीत घेण्यात आले.
मंदिर समितीची ही बैठक सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. कार्यकारी अधिकारी लेखा अधिकारी मुकेश आणि च्या पुरातत्व विभागाचे विलास वाहने सार्वजनिक बांधकाम विभाग भागाचे श्रीनिवास गुजरे वास्तुविशारद तेजस्विनी आफळे तसेच जतन संवर्धन कामाचे ठेकेदार प्रतिनिधी आणि समितीचे खाते प्रमुख विविध विभागांचे अधिकारी आणि मंदिर समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.