दि. १७ मे ते १५ जून या अधिक मास कालावधीत राज्यासह देशभरातून मोठ्या प्रमाणात भाविक श्रीक्षेत्र पंढरपूर येथे येत आहेत. दर्शन रांगांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाने विविध उपाययोजना राबविल्या आहेत. उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी पंढरपूर विभाग यांनी शासन निर्णय व मार्गदर्शक सूचनांनुसार दर्शन रांगांचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश पोलीस व मंदिर प्रशासनाला दिले आहेत. भाविकांना अन्य मार्गाने किंवा नियमबाह्य पद्धतीने दर्शन देऊ नये, असे स्पष्ट आदेश प्रशासनाने दिले आहेत.
चंद्रभागेच्या पवित्र पात्रात दोन बेवारस मृतदेह; मंदिर समिती आणि पालिकेचा सुस्त कारभार चव्हाट्यावर!
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ (२) अन्वये दर्शन रांगांमध्ये घुसखोरी करणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. काही व्यक्तींकडून रांगांमध्ये घुसून गोंधळ निर्माण होत असल्याच्या तक्रारींनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. व्हीआयपी दर्शनामुळे सामान्य भाविकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत असल्याने ती व्यवस्थाही बंद करण्यात आली आहे. दर्शन रांगांमध्ये घुसखोरी करणारे, नियमांचे उल्लंघन करणारे अथवा भाविकांना त्रास देणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती, पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन यांच्या समन्वयातून भाविकांना सुरक्षित, शिस्तबद्ध व सुलभ दर्शन मिळावे यासाठी व्यापक नियोजन करण्यात आले आहे.
आषाढी व कार्तिकी यात्रेप्रमाणे अधिक मासात २४ तास दर्शन सुरू नसते. अधिक मास कालावधीत दररोज सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत दर्शन व्यवस्था उपलब्ध आहे. दर्शन रांगेचे प्रवेशद्वार रात्री १० वाजता बंद केले जाते.रात्री १२ ते पहाटे ४ या वेळेत श्रींची विश्रांती असते, तर पहाटे ४ ते ५ या वेळेत काकड आरती व नित्यपूजा होत असल्याने दर्शन बंद राहते. दर्शन बंद असतानाही अनेक भाविक रांगेत उभे राहत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी भाविकांनी दर्शनाच्या वेळेची माहिती घेऊनच रांगेत प्रवेश करावा, असे आवाहन कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी केले आहे.






