जळगाव : लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. सहा टप्प्यातील मतदान पार पडले असून राज्यातील सर्वच मतदारसंघातील मतदान देखील झाले आहे. यंदाची लोकसभा निवडणूक सर्व पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. सर्वांचे भविष्य EVM मशीनमध्ये बंदिस्त झाले असले तरी उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे. जळगावमधील मतदानानंतर ठेवण्यात आलेल्या EVM मशीन ठेवण्यात आलेल्या स्ट्रॉग रुमचे डिस्प्ले चार मिनिटांसाठी बंद झाले. यानंतर उमेदवारांना धडकी भरली असून या माहितीला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दुजोरा दिला आहे.
अनेक मतदारासंघातील स्ट्रॉग रुमच्या कॅमेऱ्याच्या तक्रारी यावर्षी समोर आलेल्या आहेत. बारामती, शिरुरसह अनेक ठिकाणी EVM मशीन ठेवलेल्या स्ट्रॉग रुममधील कॅमेरे बंद पडल्याच्या घटना घडल्या आहेत. अहमदनदरचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी तर थेट व्हिडिओ देखील शेअर केला. यानंतर आता जळगावमध्ये हाच प्रकार घडला आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर आणि जळगाव लोकसभेसाठी 13 मे रोजी मतदान झाले होते. या मतदानानंतर दोन्ही लोकसभा मतदार संघातील ईव्हीएम स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात आले आहे. त्या ठिकाणी 24 तास सुरक्षा दलाचा पहारा आहे. तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर क्षणक्षणाला आहे. परंतु रविवारी 26 मे रोजी सकाळी 9 वाजेपासून सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डिस्प्ले बंद झाला. हा डिस्प्ले सकाळी 9.04 मिनिटांपर्यंत म्हणेज चार मिनिटे बंद होते. त्यामुळे खळबळ उडाली. ही माहिती महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांनी त्वरित जिल्हाधिकारींना कळवली.
का बंद झाला डिस्प्ले?
जळगावमधील ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या स्ट्राँग रूमचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डिस्प्ले चार मिनिटांसाठी बंद झाले. वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे जनरेटरवरून इन्व्हर्टरवर वीज पुरवठा स्थलांतरित करताना सीसीटीव्ही कॅमेराचा डिस्प्ले बंद झाला होता, असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्पष्टीकरण दिले. डिस्प्ले बंद झाले असले तरी सर्व 36 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज आपल्याकडे उपलब्ध आहे. तसेच त्याचे व्हिडिओ शूटिंग उपलब्ध असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.