आपण सोशल मीडियावर कमी पडतो : रवींद्र चव्हाण (Photo - X)
अकोला : नागपूर पदवीधर मतदारसंघातील विजयासाठी नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील एकूण अंदाजे बारा लक्ष सुशिक्षित पदवीधर मतदारांपैकी किमान पन्नास हजार नवे मतदार नोंदणी करून घ्यावे आणि सोशल मीडियावर तसेच नागरिकांच्या प्रत्यक्ष गाठीभेटीत सक्रिय होत केंद्र तसेच राज्य सरकारने केलेल्या कामांचे प्रमोशन करावे, अशा सूचना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांना दिल्या.
राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, भाजप आमदार प्रवीण दटके, कृष्णा खोपडे, परिणय फुके आणि शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी असताना या कानपिचक्या त्यांनी दिल्या आहेत. नागपूर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अवघ्या चार महिन्यांवर येऊन ठेपली असताना आतापासूनच भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गेल्यावेळी प्रथमच भाजपला पराभवाचा सामना करावा लागला होता, त्याची आठवण करून देत प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पूर्व विदर्भात दोन दिवसांत सहा बैठका घेतल्या.
राष्ट्रहिताचाच अजेंडा
काही शक्ती अजेंडा घेऊन उतरतील. नगरसेवकच, बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख आदी मुख्य कार्यकर्त्यांनी लक्ष दिले पाहिजे. आपण व्होकल झाले पाहिजे. आपली भाजप कार्यकर्ते म्हणून वेगळी ओळख. गेल्या काही काळात आपण प्रत्येक निवडणुका जिंकत आहोत. आपला जाहीरनामा अजेंडा हा अटलजींपासून मोदीजींपर्यंत राष्ट्रहिताचाच तोच अजेंडा आहे.
आपण सांगितले पाहिजे
पश्चिम बंगालची निवडणूक जिंकल्याने देशाचे काय भले झाले ते आपल्याला सर्वांना माहीत असून, आपण बोलत नाही. ते आपण सांगितले पाहिजे. पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्याच दिवशी घुसखोरी जिथून होते ती जागा केंद्राला देण्याचा निर्णय झाला. मोदींनी देशाच्या पुढील भविष्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक निर्णय घेतले आहेत. रशियाच्या अंतराळवीरांनी भारताचा तिरंगा दाखवून भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा का दिल्या? कारण भारत त्या स्थितीत पोहोचला आहे.
विकासकामे जनतेपर्यंत पोहोचविण्यावर भर द्यावा
नागपूर शहर, ग्रामीण आणि वर्धा मिळून सुमारे अंदाजे सत्तर लाख लोकसंख्या आहे. यापैकी सुशिक्षित पदवीधर अंदाजे १२ लाख असावेत. आपली राज्यात दीड लाखांपेक्षा जास्त सक्रिय सदस्य असलेली पार्टी. इथले ८० टक्के लोक डिजिटल प्लॅटफॉर्मवर सक्रिय आहेत. पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे मंत्री यांनी घेतलेले निर्णय पाहून त्यासाठी डिजाइन बनवून तुमचे नाव, तुमचे पद यांचा उल्लेख करून आपल्या पेजवर टाकत राहिलो आणि शेअर करत राहिलो तर महाराष्ट्रात एक चांगले वातावरण तयार करण्यात यशस्वी ठरू. केंद्र आणि राज्य सरकारची कामे जनतेपर्यंत पोहोचविण्यावर भर दिला पाहिजे.
उपस्थितांची घेतली विकेट
नागपूरसारख्या एअरपोर्ट बँकरोट हॉल येथील नागपूर शहर, नागपूर ग्रामीण आणि वर्धा येथील प्रमुख भाजप पदाधिकारी, नगरसेवक आणि नेत्यांच्या उपस्थितीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सर्वात आधी आपल्याला ही निवडणूक जिंकायची आहे का? आपली तशी इच्छा आहे का? असा सवाल करत उपस्थितांची विकेट घेतली.