
फोटो सौजन्य - Social Media
बुलढाणा जिल्ह्यातील दुसरबीड परिसरात सदोष सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याच्या प्रकरणात किनगाव राजा पोलिस ठाण्यात मध्य प्रदेशातील एका बियाणे कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुका कृषी अधिकारी कार्यालय, सिंदखेडराजा येथील कृषी अधिकारी (गुण नियंत्रण) जितेंद्र हिम्मतराव सानप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा क्रमांक २६१/२०२६ नोंदवण्यात आला आहे. फिर्यादीनुसार, ४ जून रोजी दुसरबीड परिसरात संबंधित कंपनीने सदोष सोयाबीन बियाण्यांची विक्री केली. या बियाण्यांची उगवण न झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. कृषी विभागाने केलेल्या तपासणीत उपलब्ध पुराव्यांच्या आधारे संबंधित कंपनीविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली.
या प्रकरणात अत्यावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ अंतर्गत कलम ३ व ७, बीज अधिनियम, १९६६ मधील कलम ६, ७, १९ व २१, बियाणे नियम, १९६८ मधील नियम १० व २३ तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(२) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या गुन्ह्याची नोंद शुक्रवारी करण्यात आली असून, ई-साक्ष आयडी क्रमांक ४००४०१८५७४२६५५७९ असा आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया महिला पोलिस हेड कॉन्स्टेबल सोनल चव्हाण यांनी पूर्ण केली असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मोहन गिते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या कारवाईमुळे सदोष बियाण्यांची विक्री करणाऱ्या कंपन्यांविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, या प्रकरणातील तपासानंतर संबंधित कंपनीकडून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणार का, याकडे तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना अधिकृत विक्रेत्याकडूनच प्रमाणित बियाणे खरेदी करण्याचे, खरेदीची पावती जतन करून ठेवण्याचे तसेच बियाण्यांबाबत कोणतीही तक्रार असल्यास त्वरित कृषी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.