मशिदींवर रात्रंदिवस वाजणारे भोंगे बंद करण्याची मागणी (फोटो- टीम नवराष्ट्र)
मुंबई: सकाळ, सायंकाळ अजानच्या नावाखाली मशिदीवरून मोठमोठ्याने भोंगे वाजवले जातात. हे भोंगे बंद करण्यात यावेत. मुंबई उच्च न्यायालयाने तसे आदेश दिले आहेत या संदर्भात कालबद्ध कार्यक्रम आखून देणार का? असा सवाल आज भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी विधानसभेत उपस्थित केला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आदेशाची अंमलबजावणी करून त्याची जबाबदारी आता पोलीस निरीक्षकांवर टाकणार असल्याचे स्पष्ट केले.
आमदार भातखळकर म्हणाले, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय २३ जानेवारी २०२५ रोजी आला आहे. जागो नेहरूनगर रेसिडेंस वेल्फेअर अस, आणि शिवसृष्टी सहकारी गृहनिर्माण सोसा. यांनी पिटीशन केली होती. या भागात अनेक मशिदींवर रात्रंदिवस भोंगे वाजतात. मोठ्या आवाजात लाऊडस्पीकर लावले जातात, असे या पिटीशन मध्ये म्हटले आहे. यावर उच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश दिले आहेत की ध्वनी प्रदूषण करणाऱ्यावर कारवाई करावी. या निर्णयाचा उपयोग करत या सगळ्यावर कठोर कारवाई करणार का ? आणि याचा कालबद्ध कार्यक्रम आखून देणार का? असे प्रश्न आमदार भातखळकर यांनी उपस्थित केले.
यावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आमदार भातखळकर यांनी सांगितले ते खरे आहे. मुंबई उच्च न्यायालयाने आपल्याला निर्देश दिलेला आहे, त्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल. मुंबई पोलीस अधिनियमाच्या अंतर्गत त्यावर दंड आकारण्यात येईल. दंड भरला नाही तर जप्ती देखील करण्यात येईल, याशिवाय परवानगी घेतली आहे का नाही, परवानगी घेतली असेल आणि त्याचे उल्लंघन झाले असेल तर परवानगी रद्द करण्यात येईल. हे कोणत्याही परिस्थितीत काटेकोरपणे करणार असून त्याची जाबाबदारी पोलीस निरीक्षकावर टाकणार आहोत. जे आमदार भातखळकर यांनी सांगितले ते या पुढच्या काळात होताना दिसून येईल, असे फडणवीस म्हणाले.
https://x.com/BhatkhalkarA/status/1899375122647302187
फडणवीसांचा संजय राऊतांना टोला
संजय राऊत रोज सकाळी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवर कधी कधी स्वकीयांवरही टिकेचे बाण सोडत असतात. त्यानंतर दिवसभरात त्याचे पडसाद उमटतात. यावर महायुतीच्या अनेक नेत्यांनी सकाळचा भोंगा बंद झाला पाहिजे, अशी गमतीत प्रतिक्रिया दिली होती. हाच धागा पकडत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, प्रार्थना स्थळावरील भोंग्यांचा विषय बंद होईल पण सकाळच्या भोंग्याचं काय करायचं, असा टोला संजय राऊत यांना लगावला आहे.
भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी आज विधानसभेत प्रार्थना स्थळ आणि मशिदींवरील भोंग्यामुळे ध्वनी प्रदूषण होत असल्याचा मुद्दा लक्षवेधी सुचनेद्वारा मांडला. मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाचा दाखला देताना त्या म्हणाल्या, प्रार्थना स्थळात जाऊन अजाण म्हणणे हा अधिकार असला तरी भोंग्यावर अजाण म्हणण्यास न्यायालयाने विरोध केला होता. भोंगा हा कुठल्याही धर्माशी निगडित नाही, असं न्यायालयाने सांगितल्याची आठवण फरांदे यांनी करून दिली. या लक्षवेधीला उत्तर देत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रार्थना स्थळावरील भोंग्यांचा विषय मांडत असताना रोज सकाळी वाजणाऱ्या भोंग्याचं काय करायचं?, असं म्हणत त्यांनी संजय राऊत यांच्यावर खोचक टिप्पणी केली आहे.