
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक विठुरायाची शासकीय महापूजा
पंढरपूर : ‘अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर…’, अशा जयघोषात पंढरपुरी नगरी दुमदुमली आहे. आषाढी एकादशीच्या पवित्र मुहूर्तावर श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या शासकीय महापूजेचा सोहळा शनिवारी (दि.25) पहाटे पार पडला. पहाटे अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि पारंपरिक विधींनुसार हा सोहळा संपन्न झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते पहाटे अडीच वाजता श्री विठ्ठल-रुक्मिणीची विधिवत महापूजा करण्यात आली.
यावर्षी मानाचे वारकरी म्हणून बाबासाहेब माधव माने व प्रभावती बाबासाहेब माने या गौरगाव (ता. कळंब, जि. धाराशिव ) यांना महापुजेचा मान मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी प्रार्थनाही केली. त्यांनी “बा विठ्ठला, राज्यातील प्रत्येक शेतकरी सुखी राहू दे. महाराष्ट्रभर समाधानकारक पाऊस पडू दे आणि प्रत्येकाच्या जीवनात सुख, समृद्धी आणि भरभराट नांदो”, अशी प्रार्थना आज विठुरायाच्या चरणी केली आहे. आषाढी एकादशीनिमित्त पहाटे तीनच्या सुमारास पारंपरिक पूजा संपन्न झाली. या पूजेदरम्यान विठ्ठलाच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करण्यात आला.
त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आणलेला खास पोशाख विठ्ठलाला परिधान करण्यात आला. यानंतर विठ्ठलाची आणि रुक्मिणी मातेची आरतीही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आली. विशेष म्हणजे, मुख्यमंत्र्यांची पूजा सुरू असतानाही सर्वसामान्य भाविकांसाठी मुखदर्शनाची रांग सुरु होती. त्यासोबतच व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद करण्यात आले. यामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळाला.
केंद्रीयमंत्र्यांचीही उपस्थिती
यावेळी केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव, राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, पालकमंत्री जयकुमार गोरे, मंत्री गिरीश महाजन, विभागीय आयुक्त शितल तेली-उगले, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, जि.प. सीईओ कुशल जैन, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह भ प गहिनीनाथ महाराज औसेकर, नगराध्यक्ष प्रणिता भालके आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनेकांचा गौरव
यंदाच्या आषाढी वारीत ‘निर्मलवारी-समृद्धवारी’ व ‘चरणसेवा’ उपक्रमांद्वारे लाखो वारकऱ्यांसाठी स्वच्छता, आरोग्य व निवाऱ्याचे सुयोग्य नियोजन करून सेवाभावाचा नवा आदर्श निर्माण केला गेला. ३५ लाख भाविक येऊनही शहर स्वच्छ व आरोग्यदायी ठेवणाऱ्या डॉक्टर, स्वयंसेवक आणि स्वच्छतादूतांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी गौरव करण्यात आला.