'कोणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही'; या जिल्ह्याचं पालकमंत्रिपद अन् CM फडणवीसांचा कोणाला इशारा?
पालकमंत्री पद कोणी घ्यायचं? यासंदर्भात मी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आम्ही मिळून ठरवू. बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद कोणी घ्यायचं? कोणाकडे द्यायचं? याची चर्चा करू. मात्र, बीड जिल्ह्यात कोणाचीही दादागिरी आम्ही चालू देणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. बीड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावं अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली होती. यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचे पडसाद हिवाळी अधिवेशनात देखील उमटले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन देत या संपूर्ण घटनेची माहिती दिली. तसेच या घटनेची एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी देखील या घटनेबाबत विधानसभेत आवाज उठवला.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थे संदर्भात बोलताना आमदार सुरेश धस यांनी देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद स्वीकारावं आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली. तसेच या प्रकरणातील काही आरोपी अद्याप फरार आहेत त्यांनाही तातडीने अटक करण्याची मागणी सुरेश धस यांनी केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या घटनेवरून सरकारवर टीका केली. या संपूर्ण प्रकरणावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं. तसंच बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबतही त्यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी सूचक प्रतिक्रिया दिली.
“बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद कोणी घ्यायचं? यासंदर्भात मी (देवेंद्र फडणवीस), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आम्ही मिळून ठरवू. मग बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद कोणी घ्यायचं? कोणाकडे द्यायचं? याची चर्चा करू. मात्र, बीड जिल्ह्यात कोणाचीही दादागिरी आम्ही चालू देणार नाही”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
बीड आणि परभणीच्या घटनेवर बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी, “बीड आणि परभणीची घटना कोणत्याही राज्याला शोभणारी नाही. अत्यंत अस्वस्थ करणाऱ्या या घटना आहेत. या दोन्ही घटनेत न्याय मिळाला नाही तर पुढचा महाराष्ट्र कसा असेल? याबाबत भिती वाटते”, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीका केली. या टीकेला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी, “महाराष्ट्र हे देशातील दुसऱ्या कोणत्याही राज्यपेक्षा सुरक्षित राज्य आहे. पण प्रत्येक घटनेचं एवढं राजकारण करणं हे विरोधकांना शोभत नसल्याचं म्हटलं आहे.