
मुंबईतील आझाद मैदानावर पुन्हा आंदोलन; थकीत मानधनासाठी संगणक परिचालक आक्रमक
गुहागर : गेल्या पाच महिन्यांपासून मानधन थकीत असल्याने संतापलेले राज्यातील आणि रत्नागिरी जिल्ह्यातील संगणक परिचालक आपल्या हक्कासाठी येत्या २४ तारखेला मुंबईतील आझाद मैदानावर धडकणार आहेत. अत्यल्प मानधन आणि त्यातही होणारा विलंब यामुळे परिचालकांचे जगणे कठीण झाले असून, शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे ‘एकदिवसीय लक्षवेधी आंदोलन’ करण्यात येणार आहे.
ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत असलेल्या संगणक परिचालकांच्या मानधनाची समस्या गेल्या दीड दशकापासून सुटलेली नाही. या पदाची निर्मिती होऊन १५ वर्षे उलटली तरी मानधनाचा प्रश्न ‘जैसे थे’ आहे. तुटपुंजे मानधन आणि ते मिळण्यासाठी महिनोंमहिने करावी लागणारी प्रतीक्षा, या चक्रात परिचालक अडकले आहेत. वेळोवेळी आंदोलने करूनही केवळ तात्पुरत्या आश्वासनांवरच त्यांची बोळवण केली जात आहे.
दरम्यान, येत्या २४ तारखेला मुंबईत होणाऱ्या या आंदोलनात रत्नागिरी जिल्ह्यातील बहुसंख्य परिचालक सहभागी होणार आहेत. ‘आता केवळ आश्वासन नको, तर ठोस तोडगा हवा,’ अशी भूमिका परिचालकांनी घेतली आहे.
पाच महिन्यांचे मानधन रखडले
सध्या ऑक्टोबर महिन्यापासूनचे मानधन थकीत आहे. चालू महिना धरता आता तब्बल पाच महिन्यांचे मानधन रखडल्याने परिचालकांचे कुटुंब चालवायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या वर्षी दिवाळीच्या तोंडावर मानधन मिळाले होते. मात्र, त्यानंतर मानधनाचा एकही हप्ता जमा झालेला नाही. कोकणात शिमगोत्सव मोठा असतो; मात्र सण तोंडावर असूनही खिशात पैसे नसल्याने परिचालकांमध्ये तीव्र चिंता आणि संताप व्यक्त होत आहे.
अहिल्यानगर महापालिकेची आर्थिक स्थिती गंभीर
दुसरीकडे, अहिल्यानगर महापालिकेची आर्थिक स्थिती सध्या गंभीर बनली असून उत्पन्न आणि खर्च यामधील तफावत वाढत चालली आहे. मालमत्ताकर व पाणीपट्टीची थकबाकी २४० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे, तर गाळेधारकांकडून सुमारे ३० कोटी रुपये येणे बाकी आहे. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असल्याने महापालिकेला दरमहा मोठ्या आर्थिक ताणाला सामोरे जावे लागत आहे.
हेदेखील वाचा : Ahilyanagar News: मनपा जमा खर्चात मोठी तफावत! 230 कोटी रुपयांची थकबाकी उघड