
tanaji sawant rahul mote
धाराशिव जिल्ह्यात महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उफाळून आले आहेत. तेरखेडा येथे सोमवारी मध्यरात्री शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कार्यकर्त्यांमध्ये जोरदार संघर्ष झाला. या घटनेत दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केल्याचा आरोप असून, इनोव्हा, फॉर्च्युनर आणि थारसह 10 ते 12 वाहनांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
धाराशिवमध्ये माजी मंत्री तानाजी सावंत आणि राष्ट्रवादीचे नेते राहुल मोटे यांच्यातील राजकीय मतभेद यापूर्वीही अनेकदा चर्चेत आले आहेत. दोन्ही नेते सध्या महायुतीचा भाग असले तरी स्थानिक पातळीवरील राजकीय संघर्ष कायम असल्याचे या घटनेतून पुन्हा स्पष्ट झाल्याचे बोलले जात आहे.
घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आरोप केला की, जिल्हा परिषद निवडणुकीतील विजयानंतर तानाजी सावंत गटाकडून आक्रमक भूमिका घेण्यात येत असून, त्यातूनच हा हल्ला घडवून आणण्यात आला. दुसरीकडे, शिवसेना कार्यकर्त्यांनी हे आरोप फेटाळून लावत, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील पराभवामुळे विरोधी गटाकडून सातत्याने वाद निर्माण केला जात असल्याचा दावा केला.
शिवसेना समर्थकांनी आणखी एक गंभीर आरोप करत, राहुल मोटे यांच्या सूचनेवरूनच हा प्रकार घडवून आणल्याचे म्हटले आहे. तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या वाहनांची तोडफोड करून आमच्यावर आरोप केले जात असल्याचा दावा शिवसेना गटाकडून करण्यात आला आहे. या परस्परविरोधी आरोपांमुळे वातावरण अधिकच तापले आहे.
दरम्यान, या प्रकरणात विशेष बाब म्हणजे दोन्ही गटांकडून परस्परांविरोधात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली नाही. त्यामुळे पोलिसांनी स्वतःहून कारवाई करत 45 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींचा शोध सुरू असून, परिसरात तणाव लक्षात घेता अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
या घटनेमुळे महायुतीतील स्थानिक पातळीवरील मतभेद पुन्हा ऐरणीवर आले आहेत. एकीकडे राज्य स्तरावर शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र सत्तेत असताना दुसरीकडे स्थानिक स्तरावरील संघर्षामुळे महायुतीतील समन्वयावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पोलिस तपासातून या घटनेमागील नेमके कारण आणि जबाबदार व्यक्ती कोण, हे स्पष्ट होण्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.