
crime (फोटो सौजन्य: social media)
येडशी फॉरेस्ट परिसरातील कुमाळवाडी शिवारात एका ४० वर्षीय व्यक्तीचा धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या भीषण हत्याकांडामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष उर्फ दगडू बाबासाहेब देशमुख (वय ४०, रा. येडशी, ता. धाराशिव) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १२ जुलै रोजी सायंकाळी ५.३० ते १३ जुलै रोजी सकाळी ६.३० या कालावधीत घडली. आरोपीने कुमाळवाडी शिवारातील निर्जन ठिकाणी संतोष यांचा धारदार शस्त्राने गळा चिरून त्यांचा जीव घेतला.
Ratnagiri Crime: सकाळी लवकर उठवल्याचा राग… सुनेने सासूला लाकडी फळीने केली बेदम मारहाण, गुन्हा दाखल
या हत्येप्रकरणी बालाजी मिटू पायघान (रा. पांगरी, ता. बार्शी, जि. सोलापूर) याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला आहे. प्राथमिक माहितीनुसार, मयताच्या पत्नीशी संशयित आरोपीचे कथित अनैतिक संबंध होते. याच अनैतिक संबंधांच्या कारणावरून आणि पूर्ववैमनस्यातून हा खून करण्यात आल्याचा थेट आरोप फिर्यादीने केला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मयताचा भाऊ अजित बाबासाहेब देशमुख (रा. येडशी) यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दिली. त्यांच्या फिर्यादीवरून १४ जुलै रोजी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात संशयित आरोपी बालाजी पायघान याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अंतर्गत खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेने येडशी परिसरात दहशतीचे वातावरण असून, फरार आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.