फोटो सौजन्य - सोशल मीडिया
जळगाव : भाजप नेते गिरीश महाजन व एकनाथ खडसे यांच्यामधील वाद सर्वांना माहिती आहे. भाजपमध्ये असल्यापासून या दोन नेत्यांमध्ये कटूता होती. त्यानंतर एकनाथ खडसे यांनी भाजपला राम राम ठोकत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ही राजकीय नाराजी आणखी वाढली. यानंतर आता पुन्हा एकदा एकनाथ खडसे हे भाजपच्या वाटेवर आहेत. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमधील नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरु आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपचा गड राखणाऱ्या रक्षा खडसे या नाराजी दूर करण्यासाठी मध्यस्थी करणार आहेत.
एकमेकांवरचे आरोप थांबवून एकत्र येण्याची वेळ
भाजपच्या नेत्या व रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे या भाजपाच्या निष्ठावान नेत्या म्हणून ओळखल्या जातात. लोकसभेच्या निकालानंतर यांना केंद्रीय मंत्रीपद देण्यात आले. मंत्रीपद मिळाल्यानंतर रक्षा खडसे यांनी पहिल्यांदाच जळगावमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी विविध राजकीय विषयावर मत मांडले. मंत्री रक्षा खडसे म्हणाल्या, “गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांनी एकत्र येऊन जळगाव जिल्ह्यासाठी काम केलं, तर त्याचा फायदा येथील जनतेला होईल. दोन्ही नेत्यांनी एकत्र यावं, यासाठी मी नक्कीच प्रयत्न करणार आहे. मी मागच्या काही वर्षांपासून दोघांमध्ये संघर्ष आणि वादविवाद बघितला आहे. पण माझी इच्छा आहे, की दोन्ही नेत्यांनी एकत्र आलं पाहिजे. एकेकाळी हे दोघे नेते एकत्र होते. त्यांनी जळगाव जिल्ह्यासाठी मोठं काम केलं आहे. मात्र, आता दोघांनी एकमेकांवरचे आरोप थांबवून एकत्र येण्याची वेळ आहे” असे मतरक्षा खडसे यांनी मांडले.
पुढे त्या म्हणाल्या, “जळगावच्या विकासासाठी आता चांगली संधी आहे. गिरीश महाजन आता मंत्री आहेत, गुलाबराव पाटीलदेखील मंत्री आहेत. मी सुद्धा केंद्रीय मंत्री आहे. त्यामुळे आज अनेक मंत्री पदं या जळगाव जिल्ह्याला लाभली आहेत. सगळ्या नेत्यांनी एकत्र येऊन काम केलं. तर नक्कीच भविष्यात जवळगाव जिल्ह्याचा विकास होऊ शकतो,” असं मत रक्षा खडसे यांनी मांडले.
एकनाथ खडसे यांचा पक्षप्रवेश कधी?
एकनाथ खडसे य़ांनी राष्ट्रावादीमध्ये प्रवेश केल्यानंतर देखील रक्षा खडसे यांनी भाजपमध्ये राहण्याचा निर्धार केला. आता एकनाथ खडसे पुन्हा एकदा भाजपच्या वाटेवर आहेत. याबाबत त्यांनी स्पष्टपणे जाणार असल्याचे सांगितले आहे. मात्र अद्याप त्यांचा पक्षप्रवेश करत घरवापसी झाली नाही. या घरवापसीसाठी गिरीश महाजन यांचा नकार असल्याची चर्चा सर्वत्र आहे. यावर रक्षा खडसे म्हणाले, “एकनाथ खडसे मोठे नेते आहेत. त्यामुळे पक्षप्रवेशाबाबतचा निर्णय आमचे केंद्र आणि राज्यातील वरिष्ठ नेते घेतील आणि वेळ आल्यावर सगळ्या गोष्टी आपोआप घडतीलच. भारतीय जनता पार्टीबरोबर जेवढी जास्त लोक जोडता येतील, तेवढी चांगलं आहे. त्यामुळे संघटनेची ताकद वाढणार आहे आणि एकनाथ खडसे तर भारतीय जनता पक्षाचे जुने नेते आहेत,” असे मत केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी मांडले.