125 कोटी रुपयांचा निवडणुकीत गैरवापर
मुंबई : सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचे वातावरण आहे. त्यानुसार, पोलिस पथकासह निवडणूक आयोगाचे भरारी पथकही कर्तव्यावर आहे. अनेक वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. त्यात सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीकडून राज्यभरात छापेमारीची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये एकाला अटक करण्यात आली आहे. यातील धक्कादायक बाब म्हणजे या निवडणुकीत 125 कोटींचा गैरवापर झाल्याचेही समोर आले आहे.
हेदेखील वाचा : पंतप्रधान कोट्यवधींचा घोटाळ अन् कारवाई म्हणत असताना उपमुख्यमंत्री केलं…; ओमराजे निंबाळकर यांचा एल्गार
राज्यातील विधानसभा निवडणुकीत एका व्यापाऱ्याने 125 कोटी रुपयांचा गैरवापर केल्याच्या पार्श्वभूमीवर ईडीने राज्यात धाडी टाकल्या. ठाणे, वाशी, मालेगाव, नाशिक, सूरत आणि अहमदाबादमध्ये व्यापारी आणि बनावट कंपन्यांशी संबंधित 24 ठिकाणी छापे टाकण्यात आले. याप्रकरणी सिराज अहमद हॅरुन मेमनला पोलिसांनी अटक केली आहे, तर आर्थिक गैरव्यवहाराचा तपास ईडी करत आहे.
मालेगाव येथील सिराज अहमद हॅरुन मेमनने एकापेक्षा जास्त बँक खाती उघडल्याचे आढळून आले आहे. मालेगाव पोलिसांनी 7 नोव्हेंबर रोजी सिराज विरोधात दाखल करून त्याला अटक केली आहे. या गुन्ह्याच्या आधारे ईडीने कारवाई सुरू केली आहे. मालेगावमधील 11 स्थानिक नागरिकांनी केलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. सिराज बँक खात्यांचा वापर निवडणुकीसाठी करत असल्याचा आरोप आहे.
11 जणांच्या खात्यात कोट्यवधींचे घबाड
कृषी व्यवसायासाठी बँक खाती उघडण्यात येत असल्याचे सांगून सिराजने 11 जणांची बँक खाती उघडली. त्याने त्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काम देण्याचे आश्वासन दिले होते. या खात्यांमध्ये कोट्यवधी रुपये जमा झाल्याचे आणि ते अन्य खात्यात वळविण्यात येत असल्याचे तक्रारदार जयेश मिसाळ यांच्या लक्षात आले. त्यांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली. सिराजने आपल्या बँक खात्यांचा गैरवापर करून त्यात बेकायदेशीरपणे पैसे हस्तांतरित केल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.
हेदेखील वाचा : मुंबईत झोपडपट्टीतील नागरिकांना मिळणार ‘इतक्या’ स्क्वेअर फुटाचे घर; देवेंद्र फडणवीसांचे मोठे आश्वासन
पालघरमधील वाहनातून तीन कोटींहून अधिक रोकड जप्त
निवडणुकांच्या घोषणेबरोबरच राज्यात आचारसंहिताही लागू झाली आहे. त्यानंतर सर्व तपास यंत्रणा आणि पोलीस राज्यात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडींवर बारीक नजर ठेवून आहेत. प्रत्येक ठिकाणी पोलिस गाड्यांचीही तपासणी करताना दिसत आहे. अशाच तपासादरम्यान पोलिसांनी पालघरमधील एका वाहनातून तीन कोटींहून अधिक रोकड काही दिवसांपूर्वीच जप्त करण्यात आली होती. यामध्ये एका आरोपीला अटकही करण्यात आली होती. त्यानंतर आता राज्यभरात ईडीकडून छापेमारीची कारवाई सुरु केली जात आहे.