
करमाळा तालुक्यातील केतुर येथे वादळी वाऱ्याचा फटका; अंगावर भिंत कोसळून वयोवृद्ध दाम्पत्याचा मृत्यू
करमाळा : करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील केतुर नंबर एक येथे रविवारी (दि.31) रात्रीच्या सुमारास अचानक वादळी वारा आला. या वादळी वाऱ्याचा तडाखा एका वृद्ध दाम्पत्याला बसला. या वादळात घराची भिंत अंगावर कोसळून वृद्ध पती-पत्नीचा मृत्यू झाला.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील केत्तूर,1 तसेच करमाळा तालुक्याच्या उजनी लाभक्षेत्रातील पोमलवाडी येथील वृद्ध दाम्पत्य उजनी जलाशया जवळील आपल्या वस्तीवर राहत होते. रविवार (ता.31) रोजी रात्री नऊ ते साडेनऊच्या दरम्यान अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने सिमेंट विटा एकावर एक रचून तयार केलेल्या भिंत अंगावर कोसळून जागीच दोघा नवले दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
मृत दाम्पत्याचे नाव जगन्नाथ मारुती नवले (वय 80) व त्यांच्या पत्नी शालन जगन्नाथ नवले (वय 75) असे आहे. हे पती-पत्नी संध्याकाळी जेवण्यासाठी बसले असता अचानक वादळी वाऱ्याला सुरुवात झाली व सदरची भिंत त्यांच्या अंगावर पडली. परंतु, आजूबाजूला कोणाचीही वस्ती नसल्याने कोणालाही काहीच माहित नव्हते. मात्र, त्यांच्या नातूने करमाळावरून फोन करून पाहिले असता आजोबाने फोन उचलला नाही. त्यामुळे तो सकाळी वस्तीवर आला असता त्याला सर्व प्रकार समजला. अचानक झालेल्या वादळी वाऱ्याच्या तडाख्याने नवले दाम्पत्याचा अचानकपणे मृत्यू झाल्याने केतुर तसेच परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
केळी पिकाचे मोठे नुकसान
उजनी लाभक्षेत्र परिसरातील पोमलवाडी, हिंगणी, गुलमोहरवाडी, केत्तूर, वाशिंबे परिसरात जोरदार वादळी वारे वाहत होते. या वाऱ्यात शेतकऱ्यांच्या शेकडो एकर केळी पिकाचे मोठे नुकसान झाले असून, संपूर्ण केळी जमीनदोस्त झाली आहे तर गावरान आंब्याची झाडे ही पूर्णपणे मोकळी झाली आहेत. अचानक झालेल्या वादळी वाऱ्याच्या तडाख्याने पश्चिम भागातील अनेक घराचे नुकसान झाले असून, फळबागाचे देखील लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
अवकाळी पावसाचा शेतीपिकांना फटका
अवकाळी पावसाचा मोठा फटका रब्बी पिके, फळबागा (जसे की आंबा, द्राक्ष) आणि भाजीपाल्याला बसला आहे. शेतात काढणीला आलेले गहू, हरभरा आणि कांदा भिजल्याने शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.