
चार महिन्यांनंतर परिवहन समितीला मुहूर्त; २० जुलैला १२ सदस्यांची घोषणा, भाजपचे १०, एमआयएम व शिवसेनेला प्रत्येकी एक जागा
सोलापूर : सोलापूर महापालिकेच्या परिवहन समितीच्या सदस्य निवडीला तब्बल चार महिन्यांनंतर अखेर मुहूर्त मिळाला असून, २० जुलै रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत १२ सदस्यांच्या नावांची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. केंद्र शासनाच्या निधीतून १५ ऑगस्टपर्यंत शहरात नवीन ई-बस दाखल होणार असल्याने परिवहन विभाग सक्षम करण्यासाठी सत्ताधारी भाजपने ही प्रक्रिया गतीने पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे.
महापालिकेतील संख्याबळानुसार परिवहन समितीवर एकूण १२ सदस्यांची निवड होणार आहे. त्यामध्ये भाजपचे १०, एमआयएमचा एक आणि शिवसेनेचा एक सदस्य असे पक्षनिहाय प्रतिनिधित्व राहणार आहे. भाजपमध्ये १० जागांसाठी तब्बल २० इच्छुकांची नावे अंतिम यादीसाठी प्रदेश नेतृत्वाकडे पाठविण्यात आली आहेत. प्रदेश स्तरावरून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर सर्वसाधारण सभेत सदस्यांची घोषणा केली जाणार आहे.
परिवहन समितीच्या निवडीचा विषय फेब्रुवारी महिन्यातील सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर होता. मात्र, स्वीकृत नगरसेवकांच्या एका जागेवरून निर्माण झालेल्या वादामुळे परिवहन समितीच्या निवडीही रखडल्या होत्या. अखेर चार महिन्यांनंतर हा तिढा सुटत असून समितीला नवे नेतृत्व मिळणार आहे.
दरम्यान, शिवसेनेकडून परिवहन समितीसाठी राजन जाधव यांच्या नावाची जोरदार चर्चा असून त्यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. एमआयएम आणि भाजपमधील संभाव्य सदस्यांच्या नावांवर अद्याप पक्षांतर्गत चर्चा सुरू आहे.
नवीन ई-बस सेवेसाठी महापालिकेने आवश्यक तयारीही अंतिम टप्प्यात आणली आहे. बस चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले असून बस शेडचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. शहर व ग्रामीण भागातील बसमार्ग निश्चित करण्यात आले असून बस पुरवठा करणाऱ्या कंपनीशी करार प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. त्यामुळे ई-बस सेवा सुरू करण्यापूर्वी परिवहन समिती अस्तित्वात आणण्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.
परिवहन व्यवस्थेच्या आधुनिकीकरणाच्या दृष्टीने ही समिती महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार असून, ई-बस सेवा, मार्ग नियोजन, पायाभूत सुविधा आणि प्रशासनिक निर्णयांमध्ये नव्या समितीची जबाबदारी निर्णायक ठरणार आहे.
यावेळी सभागृह नेते नरेंद्र काळे यावेळी म्हणाले, “फेब्रुवारी तहकुब सभा २० जुलै रोजी काढली आहे. परिवारांच्या सदस्यांच्या निवडीची प्रक्रिया या बोर्डामध्ये घेतली जाणार आहे. विजन इच्छुक आहेत यादी प्रदेशाकडे पाठवली आहे.”