भाईंदर: मिरा भाईंदर (Mira Bhayander News) विधानसभेच्या भाजप समर्थक आमदार गीता जैन (Geeta Jain News) यांनी 20 जून रोजी कनिष्ठ अभियंता शुभम पाटील (Shubham Patil) यांना कानशिलात लगावली होती. याप्रकरणी शुभम पाटील यांनी 21 जूनला काशिमिरा पोलीस ठाण्यात (Kashimira Police Station) लेखी अर्ज देऊन जैन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र सोमवारी शुभम पाटील यांनी सदर तक्रार आपण मागे घेतली आहे, असं पत्र दिले आहे. तक्रार मागे घेण्यासाठी गीता जैन यांचा दबाव असल्याचं बोललं जात आहे. (Geeta Jain Slapped Engineer)
राजकीय दबावापोटी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न
गीता जैन यांच्या मारहाणीचं प्रकरण संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरलं होतं. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील लोकप्रतिनिधींनी अशा प्रकारचं कृत्य करणं योग्य नसल्याचं मत व्यक्त केलं होतं. त्यानंतर सोमवारी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्याला ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून मारहाण करण्यात आली. तात्काळ संबंधित ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गंभीर प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र आठ दिवस उलटले असताना जैन यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही. जैन सत्ताधारी पक्षाच्या आमदार असल्याने राजकीय दबावापोटी हे प्रकरण सुरुवातीपासून दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला.
सोमवारी माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी पत्रकार परिषद घेऊन गीता जैन यांच्या विरोधात पालिका प्रशासनाकडून का गुन्हा दाखल करण्यात येत नाही? असा प्रश्न विचारला. संबंधित कनिष्ठ अभियंता शुभम पाटील भाजप पुरस्कृत कामगार संघटनेचा सदस्य असून,गुन्हा दाखल नाही झाला तर लवकरच संघटनेची बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल असं मेहता यांनी सांगितलं होत. भविष्यात आयुक्तांना देखील कानशिलात लगावली तर गुन्हा दाखल होणार नाही का? असा प्रश्न मेहता यांनी उपस्थित केला. परंतु मेहता यांच्या संघटनेचे सदस्य कनिष्ठ अभियंता शुभम पाटील यांनीच जैन यांच्या विरोधात केलेली तक्रार मागे घेतल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.
पालिका प्रशासन व जैन यांच्या संगनमताने प्रकरणाला पूर्णविराम
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास आमदार गीता जैन यांच्या कार्यालयात कनिष्ठ अभियंता शुभम पाटील व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी भेट घेतली. पालिका प्रशासन व जैन यांच्या संगनमताने या प्रकरणाला पूर्णविराम मिळाला आहे असं बोललं जात आहे.