
शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार; खानापूर, कडेगाव आणि पलूसमध्ये सलग तीन दिवस मोर्चे
विटा : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधातील आंदोलन आता अधिक तीव्र होणार असून, खानापूर, कडेगाव आणि पलूस तालुक्यांत सलग तीन दिवस हजारो शेतकऱ्यांचे एल्गार मोर्चे काढण्यात येणार आहेत. शक्तीपीठ संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या मोर्चांद्वारे महामार्ग रद्द करण्याची जोरदार मागणी करण्यात येणार आहे.
संघर्ष समितीचे निमंत्रक अॅड. दीपक लाड यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, सोमवार, २२ जून रोजी विटा येथे क्रांतिसिंह नाना पाटील पुतळ्यापासून प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत, मंगळवार, २३ जून रोजी कडेगाव येथील छत्रपती शिवाजी चौकातून प्रांताधिकारी कार्यालयावर, तर बुधवार, २४ जून रोजी पलूस येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून तहसील कार्यालयावर भव्य एल्गार मोर्चे काढण्यात येणार आहेत. तिन्ही मोर्चांची वेळ सकाळी १० वाजता ठेवण्यात आली आहे.
‘माहितीचा अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न’; RTI नियम 2026 रद्द करण्याची हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी
शक्तीपीठ महामार्गामुळे सुपीक शेती, घरे आणि शेतकऱ्यांचे अस्तित्व धोक्यात येणार असल्याची भावना व्यक्त करत आंदोलनकर्त्यांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शविला आहे. या पार्श्वभूमीवर तीनही तालुक्यांतील शेतकरी, शेतमजूर, महिला आणि युवक मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले. अॅड. लाड म्हणाले, “शेतकरी एकजुटीची ताकद सरकारला दाखविण्याची वेळ आली आहे. प्रसंगी रक्त सांडू, पण शेतकऱ्यांच्या एक इंच जमिनीला देखील धक्का लागू देणार नाही. शक्तीपीठ महामार्ग रद्द होईपर्यंत संघर्ष सुरूच राहील.”
या आंदोलनाला परिसरातील विविध सामाजिक संघटना, ग्रामस्थ आणि शेतकरी संघटनांनी जाहीर पाठिंबा दिल्याची माहितीही त्यांनी दिली. त्यामुळे या मोर्चांमध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
२२ जून (सोमवार) – विटा क्रांतिसिंह नाना पाटील पुतळा ते प्रांताधिकारी कार्यालय
२३ जून (मंगळवार) – कडेगाव छत्रपती शिवाजी चौक ते प्रांताधिकारी कार्यालय
२४ जून (बुधवार) – पलूस छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालय
शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी
शेतकऱ्यांच्या जमिनी वाचविण्यासाठी लढा
हजारो शेतकरी व महिला सहभागी होणार
विविध सामाजिक संघटनांचा जाहीर पाठिंबा