
यंदाही मुंबई शहर तुंबण्याची भीती! मिठी नदीची ६१ टक्केच सफाई; मोठ्या नाल्यांची ९३.५३% सफाई झाल्याचा दावा
पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील मोठ्या नाल्यांची ९३.५३% नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा केला आहे. मात्र, पालिकेने २६ मे २०२६ च्या अधिकृत प्रगती अहवालावरून मुंबईकरांची धाकधूक वाढवणारी वस्तुस्थिती समोर आली आहे. मुख्य नाल्यांची सफाई ९३ टक्क्यांहून अधिक झाल्याचे प्रशासन सांगत असले, तरी मुंबईला पुराच्या धोक्यापासून वाचवणारी मिठी नदी अजूनही गाळातच असून तिची एकूण सफाई अवघी ६१.५०% झाली आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी १०० टक्के नालेसफाईच्या पालिकेच्या दाव्यांमधील फोलपणा, उघडा पडला असून, पहिल्याच मुसळधार पावसात मुंबईकरांचे हाल होण्याची भीती निर्माण झाली आहे. पालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मोठ्या नाल्यांच्या सफाईत शहराच्या भागात चक्क १०४.१०% काम पूर्ण झाल्याचा अजब दावा करण्यात आला आहे, तर पूर्व उपनगरात हेच काम ८३.९९% आणि पश्चिम उपनगरात ९७.३१% झाले आहे.(फोटो सौजन्य – AI)
“शासन, समाजाने नशामुक्तीचा संदेश …”; काय म्हणाले मंत्री Mangal Prabhat Lodha?
मुख्य नाल्यांची ही सरासरी ९३.५३% वर पोहोचली असली, तरी मिठी नदीच्या सफाईत कंत्राटदारांनी कमालीची सुस्ती दाखवली आहे. मिठी नदीच्या’ ईस-५२५’ भागात तर केवळ ४८.०५% काम झाले आहे, म्हणजेच अर्ध्याहून अधिक नदी अजूनही गाळाने गच्च भरलेली आहे. तसेच ‘ईस-५२७’ मध्ये ६३.२९% आणि ‘ईस-५२६’ मध्ये ७२.३५% सफाई झाली आहे. मुंबईत मान्सूनपूर्व सरी कधीही कोसळू शकतात अशा स्थितीत मिठी नदीत अजूनही जवळपास ३८% गाळ तसाच पडून असल्याने कुर्ला, सायन, चुनाभट्टी सखल भागांना पुराचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
पालिकेच्या या आकडेवारीवरून विरोधकांनी प्रशासनाला धारेवर धरले आहे. विरोधकांनी टीका करताना म्हटले आहे की, ‘पालिका दरवर्षी मे महिन्याच्या शेवटी अशीच ९० ते ९५ टक्के नालेसफाई झाल्याची खोटी आकडेवारी प्रसिद्ध करते आणि जूनच्या पहिल्याच पावसात मुंबई तुंबते. शहरात १०४% नालेसफाई झाली कशी? हा केवळ कागदोपत्री आकड्यांचा खेळ असून कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी चाललेला हा मोठा भ्रष्टाचार आहे.’ मिठी नदीची सफाई ६१ टक्क्यांवर रेंगाळली आहे, याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर आणि कंत्राटदारांवर पालिकेने अद्याप कारवाई का केली नाही? हा मुंबईकरांच्या जिवाशी चाललेला खेळ आहे, असा हल्लाबोल विरोधकांनी केला आहे.
Eknath Shinde Amit Shah meeting: अमित शाह-एकनाथ शिंदेंची गुप्त भेटीमागचे नेमके कारण काय?
हवामान खात्याने यंदा वेळेवर आणि सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवला आहे. जर पहिल्याच मुसळधार पावसात आणि समुद्राला भरती असताना मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली, तर मुंबईची दैना उडणार हे निश्चित आहे. मुख्य नाल्यांची ९३.५३% सफाई झाल्याचा दावा करणाऱ्या पालिकेने आता कागदी अहवाल बाजूला ठेवून मिठी नदी आणि उपनगरातील नाल्यांची उर्वरित कामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत, अन्यथा यंदाही लोकल ठप्प होऊन म यातना सहन कराव्या लागतील अशी शक्यता आहे.