
जिल्हा फेडरेशनचा पुरस्कार वितरण कार्यक्रमजिल्हा फेडरेशनचा पुरस्कार वितरण कार्यक्रम
चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या सहकार भवनातील सहकार सभागृहात फेडरेशन ऑफ रत्नागिरी डिस्ट्रिक्ट चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज रत्नागिरी जिल्हा उद्योग विकास परिषद अंतर्गत उद्योजकता पुरस्कार २०२४ हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात कोकणातीलच पाच जणांना पुरस्कार देऊन सम्नानित करण्यात आलं. या कार्यक्रमाला केंद्रीय रेल्वे व उद्योग मंत्री सुरेश प्रभू कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. कोकणी उद्योजकांची जागतिक भरारी कौतुकास्पद आहे, असं प्रतिपादन या कार्यक्रमावेळी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी केलं.
फेडरेशन ऑफ रत्नागिरी डिस्ट्रिक्ट चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज रत्नागिरी जिल्हा उद्योग विकास परिषद अंतर्गत उद्योजकता पुरस्कार २०२४ या कार्यक्रमात गद्रे मरीन एक्सपोर्टचे दीपक गद्रे यांना जिल्हा फेडरेशनच्या जीवनगौरव पुरस्काराने, वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत यादव व मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांना सर्वोत्कृष्ट स्टार्टअप पुरस्काराने, स्कॉन प्रोजेक्टचे चेअरमन उद्योजक निलेश चव्हाण यांना जागतिक उद्योजकता पुरस्काराने, घरडा केमिकल्स कंपनी यांना रत्नागिरी जिल्हा उद्योजकता सामाजिक पुरस्काराने आणि डिलाईट इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे अनिल देवळे यांना जिल्हा उद्योजकता पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. माजी मंत्री केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते या सर्वांना सन्मानित करण्यात आलं.
या कार्यक्रमावेळी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितलं की, कोकणी माणसाला विशेष म्हणजे मराठी माणसाला उद्योग करता येत नाही, असे म्हटले जाते. मात्र, फेडरेशनच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात कोकणातीलच पाच जणांचा सन्मान होत आहे. या कोकणी उद्योजकांची जागतिक भरारी कौतुकास्पद आहे. जगाला काय हवे याचा शोध घेऊन उद्योग सुरू केल्यास तो कायम टिकतो. या पाच जणांनी जगाची गरज ओळखून उद्योग सुरू केल्याने ते जागतिक पातळीवरचे उद्योजक होऊ शकले आहेत. कोकणी माणूस मनात आणले तर काय करू शकते, याचे उत्तम उदाहरण आणि आदर्श हे पाच जण आहेत. त्यामुळे असे कीर्तीवान उद्योजक घडले पाहिजेत.
माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू पुढे म्हणाले की,आपल्या देशात बऱ्याच बाबी उलट आहेत. आज १४ टक्के शेतकरी उत्पन्न घेतो आणि ६५ टक्के म्हणजे ८० कोटी लोकांना तो धान्य पुरवतो. त्यामुळे ही परिस्थिती बदलली पाहिजे म्हणजे उलटी झाली पाहिजे. जगाचा पोशिंद असलेल्या शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवले पाहिजे. शेतकरी टिकला तरच सर्वांचे भले आहे, याचा विचार झाला पाहिजे असे सांगतानाच खऱ्या अर्थाने शेतकरी हा उद्योजक आहे. तो धोका पत्करून आपली शेती करीत असतो. यामुळे शेतकऱ्यांचा देखील वेळोवेळी सन्मान झाला पाहिजे. सामाजिक प्रश्नाला आपण मागे सारले आहेत. त्यामुळे त्यांचा डोंगर झाला असून ते सोडवण्याची गरज आहे.
यावेळी व्यासपीठावर पुरस्कार प्राप्त उद्योजकांसह, चिपळूण सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण, माजी आमदार डॉ विनय नातू, जेष्ठ पत्रकार मधुकर भावे, फेडरेशनचे अध्यक्ष प्रशांत पटवर्धन, सचिव केशव भट, उपाध्यक्ष राजू सावंत, माजी आमदार रमेश कदम आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला सौ. उमा सुरेश प्रभू, सेवानिवृत्त अप्पर आयुक्त एस.बी. पाटील, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन अशोक साबळे, संचालक रवींद्र भोसले, सत्यवान मामुनकर , सोमा गुडेकर, रवींद्र भोसले, शिवसेना उत्तर रत्नागिरी जिल्हा संपर्कप्रमुख सचिन कदम, सुरेश साठे, विनंती कंपनीचे जनसंपर्क अधिकारी सचिन खरे आदी मान्यवर उपस्थित होते.