कोल्हापूर : राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. त्यात विविध नेतेमंडळींकडून अनेक विधानं केली जात आहेत. त्यातच आता राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कागल विधानसभेचे आमदार हसन मुश्रीफ यांनी मोठं विधान केलं आहे. ‘महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आल्यास मी उपमुख्यमंत्री होईन’, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.
हेदेखील वाचा : गुहागरमधून मनसेचे प्रमोद गांधी यांचा उमेदवारी अर्ज दाखल! भास्कर जाधव, राजेश बेंडल यांच्याशी होणार लढत
मुश्रीफांच्या या वक्तव्याने अजित पवारांचा पक्ष दोन- दोन उपमुख्यमंत्रिपदं मिळावी यासाठी प्रयत्न करत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. आम्ही आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढत आहोत. पण, महाविकास आघाडीत अजून मुख्यमंत्रिपदाचा नेता ठरलेला नाही. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस व शिवसेना (ठाकरे) हे पक्ष मुख्यमंत्रिपदासाठी मोर्चेबांधणी करत आहेत. तर, महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पार्टीचे कार्यकर्ते अजित पवारांना मुख्यमंत्री करावं, यासाठी प्रचार करत आहेत.
कागलमधील एका प्रचारसभेत बोलत असताना मुश्रीफांनी हे वक्तव्य केलं आहे. हसन मुश्रीफ हे पुन्हा एकदा कागलमधून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. दरम्यान, स्वतःचा प्रचार करत असताना कागलमध्ये आयोजित एका प्रचारस्भेत त्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रिपदाबाबत भाष्य केलं आहे.
हसन मुश्रीफ म्हणाले, “विधानसभा निवडणुकीत महायुती विजयी होऊन आपली राज्यात सत्ता येणार आहे. कारण लाडक्या बहिणींनी तसं ठरवलं आहे. राज्यात महायुतीचं सरकार आणायचं असं त्यांनी ठरवलं आहे. राज्यात पुन्हा एकदा आमची सत्ता आली तर याहीपेक्षा अधिक चांगलं खातं मला मिळेल की नाही?” मुश्रीफांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी ‘भावी मुख्यमंत्री… हसन मुश्रीफ…’ अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यावर मुश्रीफांनी कार्यकर्त्यांना थांबवलं.
ते म्हणाले, “नाही, मुख्यमंत्री नाही होणार, झालो तर उपमुख्यमंत्री होऊ शकेन. राज्यात दोन उपमुख्यमंत्री आहेत, काही ठिकाणी तीन, मग आपल्या राज्यात तीन उपमुख्यमंत्री का होऊ शकत नाहीत”, असेही त्यांनी म्हटले आहे.