भारतीय जनता पार्टी गाव चलो अभियानामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपमय वातावरण निर्माण झाले आहे. एकीकडे घटकपक्ष आणि विरोधी पक्षात घडामोडी सुरु असताना भाजपाच्या गाव चलो अभियानाला शतप्रतिशत भाजपाच्या दृष्ठीने उतम प्रतिसाद मिळत असल्याची माहीती भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि अभियान संयोजक रणजीत देसाई यांनी दिली.
संपूर्ण देशामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने गाव चलो अभियान राबवले जात आहे. याचाच भाग म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात गाव चलो अभियान प्रत्येक गावातील प्रत्येक बुथवर राबवले जात आहे. पहिल्या पाच दिवसात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण ९१८ बूथ पैकी ४५८ बुथवर हे अभियान राबवण्यात आले आहे अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि रणजित देसाई यांनी दिली.
एकीकडे महायुतीतील घटक पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यात अनेक घडामोडी सुरू आहेत. भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मात्र राष्ट्रीय पातळीवरून दिलेल्या गाव चलो अभियानात पूर्ण ताकदीने कार्यरत आहेत. याच निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या जोरावर भारतीय जनता पार्टी आपलं शत प्रतिशत भाजपाचे स्वप्न साकार करेल असा विश्वास भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि या अभियानाचे जिल्हा संयोजक रणजीत देसाई आणि या अभियानाच्या भेटी दरम्यान व्यक्त केला.
केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना या तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचाव्यात तसेच या योजनांच्या लाभार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधावा या उद्देशाने गाव चलो अभियान राबवण्यात येत आहे. या अभियाना करता प्रत्येक बुथवर एका प्रवासी कार्यकर्त्याची निवड करून सदर प्रवासी कार्यकर्ता हा त्या बूथवरील सर्व राजकीय, सामाजिक आणि विकासात्मक बाबींचा अभ्यास आणि निरीक्षण करून माहिती संकलन करण्याचे काम करत आहे. याबरोबरच समाजातील विविध घटकांची चर्चा करून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला प्रत्येक बुथवर किमान ५१ टक्के मतदान मिळावे याकरता नियोजन करण्यात आले आहे. या प्रवासादरम्यान सर्व ठिकाणी समाजातील सर्वच घटकांनी या कार्यकर्त्याचे स्वागत करून मोदी सरकार करत असलेल्या कामांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच येणाऱ्या सर्वच निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाच्या पाठी खंबीरपणे उभे राहण्याचा विश्वास सुद्धा व्यक्त केला. या प्रवासी कार्यकर्त्यांसोबत जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे देखील गावागावात फिरत असून संपूर्ण जिल्ह्यात निवडणुकीपूर्वीच भाजपमय वातावरण निर्माण झाले आहे.
आजपर्यंत या लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीने आपल्या अधिकृत निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवली नव्हती. मात्र या गाव चलो अभियानादरम्यान अनेक ठिकाणी मतदारांनी आगामी सर्व निवडणुका या भारतीय जनता पक्षाच्या कमळ या अधिकृत निशाणीवर लढवण्याचा आग्रह केला. अनेक ठिकाणी महिला, युवा वर्ग आणि शेतकरी बांधवांनी या कार्यकर्त्यांचे स्वागत करून मोदी नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त करणारे लिखित संदेश आणि व्हिडिओ देखील बनवून दिले आहेत. निवडणुकीपूर्वी सुरू असलेल्या या अभियानामुळे पक्षाच्या सर्वच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून हे अभियान यशस्वी करण्याकरता सर्व नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते अपार मेहनत घेत आहेत असे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी सांगितले.
माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, माजी आमदार राजन तेली, माजी आमदार प्रमोद जठार यांनी या अभियानात सक्रिय सहभाग घेतला असून येत्या दोन दिवसात केंद्रीय मंत्री नारायण राव राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर आणि अन्य पदाधिकारी देखील या अभियानात सहभागी होणार आहेत. या अभियानाच्या यशस्वीतेसाठी सह संयोजक मनोज रावराणे, संजू परब तसेच सर्व मंडल अध्यक्ष, मंडल संयोजक नियोजनबद्ध कार्यक्रम राबवत आहेत. दिनांक ११ फेब्रुवारी रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या स्मृतिदिनी प्रत्येक बुथवर त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून व बूथ कमिटीची बैठक घेऊन या अभियानाची सांगता करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, रणजित देसाई यांनी दिली.