
Instead of fixing a guaranteed price for sugarcane, fix a guaranteed price for sugar.
सातारा / संजय कदम : जगात साखर उत्पादन करण्यात भारत देशाचा दुसरा क्रमांक लागतो. मग आज देशाला 10 लाख टन साखर आयात करण्याची वेळ का आली? याच उत्तर शोधण गरजेचं आहे. देशात प्रतिवर्षी ऊसाची एफआरपी ही साखर उताऱ्यावर निश्चित केली जाते. मात्र, उत्पादन झालेल्या साखर दरावर सरकारच कधीच नियोजन राहत नाही. त्यामुळे कारखाने अडचणीत येत आहेत.
साखरेचा हमी भाव निश्चित केला तर देशातील ऊस उत्पादक शेतकरी सुखी होईल. त्यामुळे सर्व समस्या सुटतील. मुळात देशात तयार होणारी साखर ही कोणी महाग केली त्याला शोधावं लागेल. आज आपल्या देशात मधुमेही रूग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मग साखर वापर कोण करत आहे तर आज औद्योगिक कामासाठी 60 ते 65 टक्के साखर जाते. तर घरगुती वापर केवळ 30 ते 35 टक्के साखर लागत आहे. मग मात्र दोघांनाही विक्री एकाच दराने का होते यासाठी साखरेचा दर दोघांना वेगवेगळा हवा. मुळात साखर दर हा 50 रूपयांपेक्षा कमी होऊ नये तर ऊस उत्पादक शेतकऱ्याला टनाला किमान 5 हजार दर निश्चित मिळेल आणि शेतकरी सुखी होईल.
मागील दोन वर्षातील परिस्थिती पाहता देशात आणि राज्यात साखर उत्पादन कमी झाले. ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. 2023-24 या गाळप हंगामात देशात 299 लाख मे टन साखर उत्पादन झाले तर मागील वर्षी च्या हंगामात 264 लाख मे टन उत्पन्न झाले म्हणजे मागील वर्षी 35 लाख टन साखर उत्पादन कमी झाले, हीच परिस्थिती राज्याची झाली. 2023-24 मध्ये राज्यात 110 लाख मे टन साखरचे उत्पादन झाले तर मागील वर्षी 81लाख मे टन साखर उत्पादन झाले म्हणजे साधारण 29 लाख टन साखर कमी झाले. ही आकडेवारी असली तरी देशात आणि राज्यात सध्या इथेनॉल निर्मितीसाठी साखर जात आहे.
अनेक कारखाने साखर दराच्या अस्थिर भूमिकेमुळे पक्की साखर इथेनॉलसाठी वापरत आहेत. त्यामुळे आज जगाला साखर निर्यात करणाऱ्या आपल्या देशाला साखर आयात करण्याची वेळ आली.
देशात सर्वाधिक साखर निर्मिती महाराष्ट्रात होते. आज राज्यात जवळपास 103 सहकारी आणि 107 खाजगी साखर कारखाने साखर निर्मिती करत आहेत. तर जगात ब्राझील देश सर्वाधिक साखर निर्मिती करतो. मात्र, दोन्ही ठिकाणी परिस्थिती भिन्न आहे. आपला साखर उद्योग हा 100 टक्के सरकारच्या नियंत्रणात नाही त्यामुळे अडचणी वाढत आहेत. ऊसाची एफआरपी ही साखरेवर केल्यास कारखाने आणि शेतकरी दोघेही सुखी होतील.
सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न पाहताय? जाणून घ्या UPSC परीक्षेचा संपूर्ण पॅटर्न आणि पेपर्सचे गणित!