
साेलापूर भाजपातील वाद चव्हाट्यावर; 'या' आमदाराचा राजीनाम्याचा इशारा
उमेदवारी देताना निष्ठावंत कार्यकत्यांवर अन्याय झाला आणि तो कार्यकर्ता इतर पक्षांकडून उभा राहिला तर आपण त्यांच्या पाठीशी राहू, असे विजयकुमार देशमुख यांनी म्हटले आहे. तर पक्षाने भूमिका बदलल्यास आपणही बदलू, असा इशारा आमदार सुभाष देशमुख यांनी दिला आहे.
या दोन्ही आमदारांनी वेगवेगळ्या ठिकाणी माध्यमांशी बोलताना निष्ठावंत कार्यकर्ता हा समान धागा अधोरेखित केला आहे. आमदार विजयकुमार देशमुख यांनी सध्याच्या निवडणूक यंत्रणेबाबत उघडपणे प्रश्न उपस्थित केले. निवडणूक समितीत नेमके कोण सदस्य आहेत, कोण निर्णय घेत आहे. हेच स्पष्ट नसल्याचे त्यांनी सांगितले, समिती जाहीर झाली तेव्हा रघुनाथ कुलकर्णी यांचा समावेश होता. मात्र, नंतर त्यांची भुमिका दिसून न आल्याने संभ्रम वाढल्याचे त्यांनी नमूद केले.
काही जणांचे भाजपमध्ये प्रवेश झाले आहेत. पक्षात प्रवेश करतानाच ज्यांचा प्रवेश झाला आहे, त्यांना उमेदवारी दिली जाणार नाही, हे पक्ष नेतृत्वाने स्पष्ट सांगितले होते, जर पक्षाने त्या भूमिकेत बदल केला तर आम्हालाही आपली भूमिका बदलावी लागेल, असा थेट इशारा आमदार सुभाष देशमुख दिला आहे. दोन ज्येष्ठ आमदारांच्या या स्पष्ट आणि आक्रमक वक्तव्यांमुळे भाजपातील उमेदवारी प्रक्रिया, अधिकारकेंद्र आणि कार्यकत्यांचे व्यवस्थापन या मुद्द्यांवर पक्ष नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय देत अंतर्गत समन्वय साधला जातो की नाही, यावरच भाजपची निवडणूक रणनीती आणि यश मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहणार आहे.
पालकमंत्र्यांकडेच सर्व अधिकार केंद्रित
वाटाघाटी नेमक्या कोणासोबत करायच्या, हे स्पष्ट नसल्यामुळे आपण कोणाशीही संपर्क साधलेला नसल्याचे सांगत, सध्याच्या परिस्थितीत पालकमंत्र्यांकडेच सर्व अधिकार केंद्रित झाल्याचे चित्र असल्याची सूचक टिप्पणी त्यांनी केली. गेल्या पाच टर्मपासून आपल्यासोबत उभा असलेल्या कार्यकत्यांवर अन्याय सहन केला जाणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. निष्ठावंत कार्यकर्ता अन्य पक्षातून उभा राहिला तर त्याचा प्रचार करण्याची तयारी आमदार विजयकुमार देशमुख यांनी जाहीर केली.
निष्ठावंत कार्यकत्यांच्या मनात अस्वस्थता
नवीन आलेल्या कार्यकर्त्यांमुळे जुन्या निष्ठावंत कार्यकत्यांच्या मनात अस्वस्थता निर्माण होणे स्वाभाविक आहे. आपल्या उमेदवारीवर गदा येईल, अशी भीती जुन्या कार्यकत्यांना वाटत असल्यानेच नाराजी वाढत आहे. एखादा निष्ठावंत कार्यकर्ता, मित्र पक्षातून उभा राहिला, तर त्याला निवडून आणणे आवश्यक आहे. तो निवडून आल्यावर पुन्हा भाजपमध्ये येईल. ज्या कार्यकत्यांनी सातत्याने पक्षासाठी संघर्ष केला आहे, त्यांच्या ताकदीची आणि क्षमतेची दखल घेऊन त्यांच्या पाठिशी उभे राहणे ही आपली नैतिक जवाबदारी असल्याचे आमदार सुभाष देशमुख यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेकडून ३० जागांची मागणी
गुरुवारी पालकमंत्री जयकुमार गोरे आणि शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय कदम यांच्यात युतीबाबत झालेल्या प्राथमिक चर्चेत ५१ जागांची मागणी करण्यात आली होती. शुक्रवारी भाजपा शहराध्यक्षा तडवळकर यांन शिवसेनेला नेमक्या किती जागा हव्यात, याबाबत अचूक भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. या चर्चेदरम्यान शिवसेनेकडून ३० जागांची मागणी करण्यात आल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी दिली. शिवसेनेच्या या सुधारित प्रस्तावाबाबत भाजपा शहराध्यक्षा तडवळकर यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासोबत चर्चा करून अंतिम निर्णय कळविला जाईल, असे स्पष्टीकरण दिल्याचे समजते.
प्रदेशाध्यक्षांच्या बैठकीला आमदारांची दांडी
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मुंबई येथील निवासस्थानी बोलावलेल्या पक्षाच्या बैठकीस सुभाष देशमुख आणि विजय देशमुख या दोन्ही आमदारांनी पाठ फिरवली. पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे, भाजपाच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर आणि आमदार देशमुख यांचे पुत्र मनीष देशमुख बैठकीस उपस्थित होते.