
Jalgaon News: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
Jalgaon News: जळगाव (वा.) रोजप्रमाणे सकाळी घरातून कामावर जाण्यासाठी निघालेला एक कष्टकरी तरुण काही मिनिटांतच काळाच्या पडद्याआड गेला. इच्छादेवी चौक परिसरातील राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास भरधाव इनोव्हा कारने घडविलेल्या भीषण अपघातात लीलाधर मंगल जाधव (वय ३६) यांचा जागीच मृत्यू झाला. तर रस्ता ओलांडणारे कन्हैया राजेश गारुंगे (वय ४६, रा. कंजरवाडा) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर कारचालक वाहन घटनास्थळीच सोडून पसार झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. मूळचे कठोरा (ता. जळगाव) येथील असलेले लीलाधर जाधव हे गेल्या चार वर्षांपासून शहरातील चंदू अण्णानगर येथे कुटुंबासह राहत होते. एमआयडीसीतील एका पाईप कंपनीत ते कामगार म्हणून कार्यरत होते. बुधवारी सकाळीही नेहमीप्रमाणे पत्नी आणि मुलाचा निरोप घेऊन ते दुचाकीवरून कामासाठी निघाले होते.
Jalgaon LIVE Updates | Navarashtra (नवराष्ट्र)
मात्र नियतीने त्यांच्या आयुष्याचा प्रवास इच्छादेवी चौकातच थांबवला. अजिंठा चौकाच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या (एमएच-१९ बीएल-७०७७) क्रमांकाच्या इनोव्हा कारने प्रथम रस्ता ओलांडणाऱ्या कन्हैया गारुंगे यांना धडक दिली. त्यानंतर कार दुभाजकावर आदळली आणि त्याचवेळी समोरून येणाऱ्या जाधव यांच्या दुचाकीला जोरदार धडक बसली. धडकेचा वेग इतका प्रचंड होता की कार दोनवेळा पलटी झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. या भीषण धडकेत लीलाधर जाधव यांचा जागीच मृत्यू अपघातानंतर परिसरातील झाला.
नागरिकांनी तत्काळ धाव घेत जखमी कन्हैया गारुंगे यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र कारचालक जतिन संजय बोरसे (वय २१, रा. वाघनगर) हा वाहन घटनास्थळीच सोडून फरार झाला. कारमध्ये आणखी काहीजण असल्याचा आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला असून पोलिसांनी त्यादृष्टीनेही तपास सुरू केला आहे. दरम्यान, जाधव यांचा मृतदेह पाहता कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला. पत्नीचा आक्रोश, लहान मुलाच्या डोळ्यांतील हरवलेले पितृछत्र आणि वृद्ध आई-वडिलांचे दुःख पाहून रुग्णालय परिसरातील अनेकांचे डोळे पाणावले.
Jalgaon News: जळगावात आदिवासीच्या प्रश्नांसाठी पालकमंत्री अॅक्शन …