
प्रतापराव शिंदे हे प्रगतशील शेतकरी म्हणून ओळखले जात होते. तीन एकरात उभी केलेली द्राक्षबाग ही त्यांच्या आयुष्याची ओळख होती. आधुनिक शेती पद्धती, कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी बाग फुलवली होती. पण बदलते हवामान, वाढलेला खर्च, खत-औषधांच्या दरातील प्रचंड वाढ आणि बाजारातील अनिश्चितता यांनी त्यांच्या स्वप्नांवर अक्षरशः घाला घातला.
पाटण तालुक्यात 23 ग्रामपंचायतीत पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; 28 एप्रिलला होणार मतदान
द्राक्षबाग उभारण्यासाठी घेतलेले २० ते २५ लाख रुपयांचे कर्ज त्यांच्या गळ्यातील फास बनले. उत्पन्न मिळेनासे झाल्याने कर्ज थकीत गेले. व्याजाचा बोजा वाढतच गेला. एक कर्ज फेडण्यासाठी दुसरे कर्ज-अशी साखळी सुरू झाली. फेडरल बँकेकडून कर्ज घेऊन जुने कर्ज फेडले, पण नव्या हप्त्यांनी त्यांना अधिकच गुदमरवले.
या वर्षी निसर्गाने पूर्णपणे पाठ फिरवली. रोगराई आणि हवामानातील अनियमिततेमुळे तीनही एकर बागेला द्राक्षेच लागली नाहीत. वर्षभराचा खर्च पाण्यात गेला.
शेवटी विवश होऊन त्यांनी स्वतःच्या हाताने उभी केलेली द्राक्षबाग तोडून टाकली.त्या क्षणी त्यांच्या आयुष्याची उभी दुनिया कोसळली होती.
मार्च अखेर जवळ येत असताना बँकांचे हप्ते, घराची जबाबदारी, मुलांच्या शिक्षणाची चिंता, या सगळ्यांनी त्यांच्या मनाचा ताबा घेतला होता. उत्पन्नाचा कोणताही स्रोत नाही, आणि कर्जाचा वाढता डोंगर या कात्रीत सापडलेल्या प्रतापरावांनी अखेर हार मानली.
सकाळी ते नेहमीप्रमाणे शेतात गेले; पण यावेळी ते परतलेच नाहीत, शेतात गळफास घेत त्यांनी जीवन संपवले. ही बातमी कळताच मळणगावात एकच हंबरडा फूटला. प्रतापराव शिंदे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. मुलगा इचलकरंजी येथे अभियांत्रिकी शिक्षण घेत आहे, तर मुलगी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. ज्यांच्या भविष्यासाठी त्यांनी स्वप्ने पाहिली, त्याच कुटुंबाला आज आधाराचा स्तंभ गमवावा लागला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. अंत्यसंस्कारावेळी संपूर्ण गाव उपस्थित होते, आणि प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते.
“मेहनती शेतकऱ्याला निसर्गाच्या लहरीपणामुळे जीव द्यावा लागणे ही अत्यंत वेदनादायक बाब आहे. शासनाने त्यांच्या कुटुंबाला तात्काळ मदत द्यावी, कर्ज माफ करावे आणि द्राक्षबागायतदारांसाठी ठोस उपाययोजना कराव्यात.” अशी मागणी मळणगावच्या सरपंच सुरेखा जाधव यांनी केली आहे.