
यावेळी पालकमंत्री म्हणाले, लोकांमध्ये अकारण भीती निर्माण झाल्याने आणि भविष्यात टंचाई भासेल या कल्पनेने बुकिंगची संख्या वाढली असून गर्दी
होत आहे. प्रशासनाने लोकांना योग्य माहिती देऊन त्यांची भीती दूर करावी. प्रशासन या सर्व घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहे. जिल्ह्यात घरगुती
गॅसचा तुटवडा नसून मुबलक साठा उपलब्ध आहे. घरगुती वापरासाठी मागणी अचानक वाढल्याने व्यावसायिक सिलिंडरच्या वितरणावर शासनाकडून काही बंधने घालण्यात आली आहेत, मात्र ही समस्याही येत्या दोन-तीन दिवसांत सुटेल. पुढील आठ दिवसांपर्यंत योग्य समन्वय ठेवून प्रभावी सनियंत्रण ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी याबाबत सर्व क्षेत्रीय कार्यालयांना सूचना दिल्या असून,नागरिकांमधील धास्ती (पॅनिक) कमी करण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात असल्याचे सांगितले.
जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी बैठकीत माहिती देताना सांगितले की, जिल्ह्यात एकूण ११२ गॅस एजन्सी असून ११.५ लाख घरगुती गॅस जोडण्या आहेत. तसेच ११ हजारांहून अधिक ग्राहकांना पाइपलाइनद्वारे गॅस पुरवठा केला जातो, मोठ्या प्रमाणात एकाच वेळी बुकिंग झाल्याने काही काळासाठी बुकिंग सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता, मात्र ते आता पुन्हा पूर्ववत करण्यात आले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोर अंमलबजावणी केली जात असून सर्व गर्दीच्या ठिकाणांची पाहणी करण्यात येत आहे. रुग्णालये, शैक्षणिक संस्था, वृद्धाश्रम आणि अनाथालये यासारख्या अत्यावश्यक सार्वजनिक संस्थांचा व्यावसायिक गॅस पुरवठा खंडित करण्यात आलेला नाही, तो सुरळीत सुरू आहे. यावेळी खासदार छत्रपती शाहू महाराज, महापौर रुपाराणी निकम, आमदार अशोक माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका सदस्य आदिल फरास, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख, उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी तसेच संबंधित गॅस एजन्सीचे प्रमुख व पुरवठादार उपस्थित होते.