
ऐन उन्हाळ्याच धरण कोरडं ठाक
17 टक्के पाणीसाठ्याने पाणीप्रश्न आणि शेती धोक्यात
कोल्हापूर : शिराळा तालुक्यातील शिवणी धरणात केवळ 16 टक्के पाणी शिल्लक आहे. धरणातील पाणी गेटपर्यंत पोहोचत नसल्याने कालव्याला पाणी सोडणे पूर्णपणे बंद झाले आहे. त्यामुळे शिराळा, खेड व शिवणी परिसरांतील शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून ऊस व भाजीपाला पिके वाळू लागली आहेत. यावर्षी कमी पावसामुळे शिवणी धरण पूर्ण क्षमतेने भरले नाही. धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेले सुमारे 15हेक्टर ऊसक्षेत्र सध्या धोक्यात आले आहे. वाकुर्डे बुद्रुक उपसा जलसिंचन योजनेचे पाणी शिवणी धरणात सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. तालुक्यातील विहिरींनी तळ गाठला असून 330कूपनलिकांची पाण्याची पातळीही खालावली आहे. त्यापैकी 35 कूपनलिकांची दुरुस्ती करण्यात आली आहे. तालुक्यातील 20 पाझर तलाव पूर्णपणे कोरडे पडले असून उर्वरित तलावांमध्ये सुमारे 20 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
गतवर्षी योजनेतून 157.02 द.ल.घ.फू. पाणी उपलब्ध वाकुर्डे बुद्रुक उपसा जलसिंचन योजनेमुळे करमजाई व मोरणा धरणांवर अवलंबून असलेल्या शेतीला मोठा फायदा झाला आहे. मागील वर्षी या योजनेतून 157.02 दशलक्ष घनफूट पाणी उपलब्ध झाले होते. करमजाई धरणात पाणी सोडण्यात आले आहे. शिवणी व मोरणा धरणात सोडण्याची मागणी आहे. मोरणा धरणातून सात दिवस पाणी सोडले जाते, तर आठ दिवस बंद ठेवले जाते. या पाण्यामुळे शिराळा शहर व एमआयडीसीला पाणीपुरवठा केला जातो. तसेच उपवळे, पाडळी, बिऊर, तडवळे, अंत्री, भाटशिरगाव व मांगले या गावांतील शेतीला लाभ होतो.
ऊस, भाजीपाला शेती धोक्यात; वाकुर्डे बुद्रुकचे पाणी ‘मोरणा’त सोडण्याची मागणी
वाकुर्डे बुद्रुक उपसा जलसिंचन योजनेचे पाणी मोरणा धरणात सोडण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. ऊस व भाजीपाला पिकांना पाण्याची कमतरता भासू लागली आहे. वाकुर्डे बुद्रुक उपसा जलसिंचन योजनेचा फायदा शिराळा तालुक्यातील शेतकऱ्यांपेक्षा कराड तालुक्यातील शेतकऱ्यांना जास्त प्रमाणात होत आहे. वाकुर्डे बुद्रुक उपसा जलसिंचन योजना शिराळा तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी मिळण्यासाठी करण्यात आली होती. मात्र, वाकुर्डे बुद्रुक उपसा जलसिंचन योजनेचे पाणी मोरणा धरणात व नदीमध्ये आले नाही. वाकुर्डे बुद्रुक उपसा जलसिंचन योजनेचे पाणी मोरणा धरणात सोडण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. वाकुर्डे बुद्रुक उपसा जलसिंचन योजनेचे पाणी करमजाई धरणात आले,
मात्र अंत्री धरण व मोरणा धरणात आले नाही. करमजाई धरणातून वाकुर्डे बुद्रुक उपसा जलसिंचन योजनेचे पाणी दरवर्षी कराड तालुक्यातील दक्षिण मांड नदीत सोडले जाते. कराड तालुक्यातील 2772हेक्टर क्षेत्राला पाणी मिळत आहे. घोगाव, उंडाळे तलावात पाणी सोडले जाते. मोरणा धरणात 42टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी तो 35टक्के होता. मोरणा धरणातून सात दिवस पाणी सोडण्यात येते, तर आठ दिवस बंद असते. मोरणातील पाण्यावर 495 हेक्टर ऊसक्षेत्र भिजते. मोरणा क्षेत्रातील शिराळा, उपवळे, पाडळी, बिऊर, तडवळे, अंत्री, भाटशिरगाव, मांगले या गावांतील शेतीला या पाण्याचा फायदा होतो. शिराळा शहराला व शिराळा एम.आय.डी.सी.ला पाणीपुरवठा होतो.