
सध्या सुरू असलेल्या प्रचंड उन्हाळ्याच्या झळा सोसत देखील भुईमुगाचे पीक हे माळरानावर तरारले आहे. धनलक्ष्मी या भुईमुगाच्या प्रजातीचे उत्पादन बोद पद्धतीने घेतले आहे. साडेतीन ते चार फुटाचा एक बोद निर्माण करून दीड ते दोन फुटावर टोकन करत एका बोदावर तीन सऱ्या या पद्धतीने हे उत्पादन घेतले आहे. रासायनिक खताऐवजी सुरुवातीपासूनच सेंद्रिय खतांचा वापर केल्यामुळे भुईमुगाचे पीक हे तरारले आहे. अंदाजे एक एकर क्षेत्रामधून दीडशे ते पावणेदोनशे क्विंटल भुईमुगाचे उत्पादन मिळण्याची शक्यता असल्यामुळे एकरी दीड लाख ते दोन लाख असे उत्पादन या भुईमुगाच्या पिकातून मिळणार आहे.
८ सध्याच्या काळात शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन, तुषार सिंचन अशा आधुनिक सिंचन पद्धतीचा वापर करत मल्चिंग पेपरच्या सहाय्याने जर उत्पादन घेतले, तर चांगले उत्पादन मिळते, रासायनिक खतांचा कमी वापर करत सेंद्रिय खतांचा अधिकाधिक वापर केल्यास त्याचाही फायदा शेतकऱ्याला होतो. बाजारभावाचे व शेतमालाच्या मागणीचे थोडेफार ज्ञान ठेवले असता शेती व्यवसाय हा फायदेशीर ठरू शकतो. – गंगाधर पाटील, प्रगतशील शेतकरी महागांव
आधुनिकतेची जोड देत शेतीचे उत्पादन
परंपरागत शेतीला फाटा देत गंगाधर पाटील यांनी पत्नी सावित्री हिच्या कष्टातून ही शेती फुलवली आहे. भुईमुगाबरोबरच चवळी, घेवडा, मिरची, वांगी, कांदा अशा विविध पिकांचे उत्पादन देखील मल्चिंग पेपरचा वापर करत परंपरागत शेती पद्धतीला आधुनिकतेची जोड देत त्यांनी घेतले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना गंगाधर पाटलांचा हा प्रयोग हा आदर्शवत वाटत आहे.