तांबडा, पांढरा रस्सा अर्थकारणाचा कणा
कोल्हापूरला मोठीच खाद्यसंस्कृती आहे. यामध्ये मिसळ, वडापाव, भडंग, गुळ, ठिकपुलींची बर्फी आदी खाद्यपदार्थ प्रसिद्ध आहेत. परंतू कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा जागतिक पातळीवर पोहोचला आहे. जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात गेले, तरी कोल्हापूर सारखा तांबडा, पांढरा रस्सा बनणे शक्य नाही, कारण कोल्हापूरच्या पाण्यामध्ये वेगळीच चव असल्याने हा तांबडा पांढरा रस्सा फक्त कोल्हापुरातच चविष्ट बनू शकतो. त्यामुळे खाद्य संस्कृतीमध्ये अर्थकारणाचा मुख्य कणा हा तांबडा पांढरा रस्सा असेल, यात शंका नाही.
कोल्हापुरी चप्पल आणि फेटा जगभर प्रसिद्ध
कोल्हापूरची चप्पल, फेटा जगभर प्रसिद्ध असून मागणी जास्त आहे. त्यामुळे कोल्हापुरी चप्पल विक्रीला चालना मिळाली, तर येथील व्यवसायिकांना चांगलीच मदत होणार आहे. तसेच परंपरेपासून चमडे कमवून कोल्हापुरी चप्पल तयार करणाऱ्या नागरिकांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. तसेच कोल्हापुरी चप्पलला मोठे मार्केट मिळेल.
शेकडो वीरगळ, स्त्रीशक्तीची साक्ष देणाऱ्या सतीशिळा
इतिहासाची महती सांगणारे शेकडो वीरगळ, विविध कालखंडातील वीरांची समाधी, स्त्रीशक्तीची साक्ष देणाऱ्या सतीशिळा, शिवकालीन इतिहासाची साक्ष देणारी पावनखिंड, पन्हाळगड व विशाळगडावरील स्मारके, गडहिंग्लज नेसरी खिंडीतील प्रतापराव गुजर व त्यांच्या शिलेदारांचे स्मारक, पन्हाळगडावरील रामचंद्र पंत अमात्य स्मारक, पंचगंगा नदी काठावरील छत्रपतींची स्मशानभूमि (संस्थान शिवसागर) अशा अनेक ऐतिहासिक व्यक्तीमत्वांची स्मारक कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी आहेत.
मसाई पठार ठरतेय मुख्य आकर्षण
पन्हाळा कोल्हापूर जिल्ह्यातील तालुक्यात असलेल्या कुशीरे-पोहाळे येथील पांडव लेणी, मसाई पठार परिसरातील बौध्द लेणी पाहण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात. एवढेच नाही तर बौद्ध भिकूसह, संशोधक बौद्ध लेण्यांचा अभ्यास करीत असतात. तसेच मसाई पठार येथे चित्रपट निर्मितीही करण्याची परंपरा आहे. चित्रपट निर्मितीसाठी हा परिसर अतिशय योग्य मानला जातो. तसेच येथे पावसाळ्यात रंगीबेरंगी फुलांची चादर पसरलेली असते. त्यामुळे ही जैवविविधता राहण्यासाठीही अभ्यासक येत असतात. मसाई पठार पर्यटनाचे मुख्य आकर्षण आहे.
कोल्हापुरातील धार्मिक महत्त्वाची स्थळे
करवीर निवासिनी अंबाबाई, दख्खनचा राजा जोतिबा, नृसिंहवाडी या देवस्थानच्या दर्शनासाठी लाखो भाविक येत असतात. अंबाबाईंच्या दर्शनाला सुट्टीच्या दिवशी किमान एक लाख तर नवरात्र उत्सवामध्ये नऊ दिवस दोन लाखापर्यंत भाविक दर्शन घेत असतात. याशिवाय खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर, टेंबलाई मंदिर, कात्यायनी, नवदुर्गा, नृसिंहवाडी, आदमापूर, कसबा बीड येथील महादेव मंदिर, आदी धार्मिक स्थळे सुट्टीच्या दिवशी भाविकांनी फुलून गेलेली असतात. पर्यटन सर्किट झाल्यानंतर कोल्हापूरला पर्यटक येण्याच्या संख्येत वाढ होईल. परिणामी कोल्हापूरचे अर्थकारण सुधारण्यास मदत होणार आहे.






