
लुटीचा कळस; ७५ चा गॅस थेट ८० वर; रिक्षाचालकांत संताप
सकाळपासूनच या पंपावर दरांचा खेळ सुरू होता. रिक्षाचालकांच्या मते, सकाळी ७५ रुपये दराने मिळणारा गॅस अवध्या – काही वेळातच ८० रुपये करण्यात आला. दहा-दहा मिनिटाला रेट कसे काय वाढतात? ही सामान्य रिक्षाचालकांची सरळ – सरळ लूट आहे, असा संताप व्यक्त करत रिक्षाचालकांनी पंप परिसरात रिक्षा उभ्या करून निदर्शने केली. यामुळे पंपावरील गॅस विक्री पूर्णपणे बंद पडली.
माघार न घेण्याचा रिक्षाचालकांचा पवित्रा
रिक्षा संघटनेचे अध्यक्ष राजू जाधव यांनी या प्रकाराचा तीव्र निषेध केला. ते म्हणाले की, गेल्या आठ दिवसांपासून हे दरवाढीचे सत्र सुरू आहे. गॅस दरवाढ झाली असेल तर त्यासंबंधीचे अधिकृत कंपनीचे पत्र किंवा ईमेल आम्हाला दाखवावा, अशी मागणी आम्ही केली, मात्र कर्मचाऱ्यांनी असे कोणतेही कागदपत्र दाखवण्यास स्पष्ट नकार दिला. मग ही दरवाढ नेमकी कोणाच्या आदेशाने सुरू आहे, असा सवाल संतप्त चालकानी विचारला. जोपर्यंत दरवाढीचा ठोस खुलासा मिळत नाही आणि दर कमी होत नाहीत, तोपर्यंत माधार घेणार नाही, असा पवित्रा रिक्षाचालकांनी घेतला होता,
जागतिक परिस्थितीचे कारण; रिक्षावाल्यांचे कंबरडे मोडले
या गोंधळाबाबत कंपनीच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात इंधन टंचाई निर्माण झाली आहे. आयातीचे दर वाढल्याने त्याचा थेट परिणाम गॅस दरावर झाला आहे. महाराष्ट्रातील सर्व शहरांत हेच दर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले, मात्र, ही दरवाढ सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने रिक्षा व्यवसायाचे कंबरडे मोडले आहे.