
मुसळधार पावसाने शाळेला धोका! दरड कोसळल्यानंतर संरक्षणासाठी 15 लाखांचा निधी मंजूर
या दरडीमुळे शाळेतील मुला-मुलींच्या शौचालयाचे तसेच किचनशेडचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आणखी पाऊस झाल्यास डोंगराचा अधिक भाग खचून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याची भावना पालक आणि ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर शाळेच्या पाठीमागे तातडीने मजबूत संरक्षण भिंत उभारण्यात यावी, खचलेली माती व दगड-गोटे त्वरित हटवावेत, तसेच नुकसानग्रस्त शौचालय व किचनशेडची युद्धपातळीवर दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
या आपत्कालीन परिस्थितीची प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन घटनास्थळी पाहणी करावी आणि भविष्यातील संभाव्य अनर्थ टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी पिराचीवाडी ग्रामस्थांसह सामाजिक कार्यकर्ते युवराज कोंढाळकर यांनी केली आहे. सदर ठिकाणी बातमीची दखल घेत या विभागाच्या बावधन जिल्हा परिषद गटाच्या जिल्हा परिषद सदस्या व महिला बालकल्याण सभापती शिंदे यांनी दखल घेत सभापती यांनी घटनास्थळी भेट दिली.
यावेळी जिल्हा परिषद फंडातून तात्काळ 15 लाख रुपये मंजूर केले असून संरक्षण भिंतीसाठी आठ लाख रुपये, शौचालय – बाथरूमसाठी तीन लाख रुपये, पत्र्यासाठी तीन लाख रुपये असे 15 लाख रुपये तातडीने मंजूर करून हे काम तात्काळ चालू करण्याचे आदेश महिला बालकल्याण समितीच्या सभापती ऋतुजा शिंदे यांनी दिले व त्या शाळेतील विद्यार्थीना तात्पुरते मंदिरामध्ये बसण्याची व्यवस्था करण्याची सोय केली आहे. याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी किरणकुमार मोरे, इंजिनिअर केदार गायकवाड, चंद्रकांत मांढरे, सर्जेराव कोंडके, युवराज कोंढाळकर, ग्रामपंचायत अधिकारी अनिता धायगुडे, शाळेचे शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकारी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.