
Latur Infrastructure Development: लातूर विकास आराखड्यावर उच्चस्तरीय बैठक; पालकमंत्री भोसले म्हणाले,"मुदतीत काम न..
Latur Infrastructure Development: लातूर जिल्हा वार्षिक योजनेतून प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली कामे दिलेल्या कालावधीत पूर्ण होण्यासाठी सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी नियोजनबद्ध काम करावे. कोणत्याही स्थितीत निधी अखर्चित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. यासोबतच प्रत्येक काम गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार होईल, याची काळजी घ्यावी, अशा सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी आमदार विक्रम काळे, आमदार अमित विलासराव देशमुख, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार संजय बनसोडे, आमदार अभिमन्यू पवार, आमदार रमेश कराड, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त श्रीमती मानसी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, खासदार डॉ. शिवाजी काळगे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे या बैठकीमध्ये सहभागी झाले होते.
नागरिकांना चांगल्या सुविधा मिळण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून प्रस्तावित कामे दिलेल्या कालावधीत पूर्ण होणे गरजेचे आहे. या कामांमध्ये गुणवत्तेच्या बाबतीत कोणतीही तडजोड किंवा हयगय होणार नाही, याची दक्षता संबंधित शासकीय यंत्रणा प्रमुखांनी घ्यावी, असे पालकमंत्री भोसले म्हणाले. तसेच कंत्राटदारांकडून मुदतीत कामे पूर्ण केली जात नसल्यास त्यांच्यावर संबंधित विभागाने कठोर कार्यवाही करावी. एखादा कंत्राटदार मुदत संपूनही काम पूर्ण अथवा सुरु करत नसेल तर असे काम इतर कंत्राटदाराला देवून लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावे. विनाकारण विलंब करणाऱ्या कंत्राटदारांना पुन्हा जिल्ह्यात नवीन काम देवू नये, अशा सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
उदगीर, जळकोट तालुक्यातील निजामकालीन शाळांच्या इमारतींची तातडीने दुरुस्ती होणे गरजेचे आहे. यासोबतच उदगीर येथे उभारण्यात आलेल्या विश्वशांती बुद्ध विहार परिसरात विद्युत रोषणाई करण्याच्या कामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, असे आमदार संजय बनसोडे यांनी सांगितले. लातूर शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक, स्व. विलासराव देशमुख मार्ग आणि बाह्यवळण रस्त्याच्या कामाला गती द्यावी. छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकाच्या धर्तीवर लातूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील रस्ते, उड्डाणपुलाचे काम करण्यासाठी प्रारूप आराखडा तयार करावा, या आराखड्याचे संबंधित लोकप्रतिनिधींसमोर सादरीकरण करून त्यांच्याही सूचना घ्याव्यात, असे पालकमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्यानुसार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कामासाठी अतिरिक्त निधीचा प्रस्ताव, तसेच माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्मारकाचा प्रस्ताव महानगरपालिकेने तातडीने शासनाला सादर करावा, यासाठी राज्य शासनामार्फत निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
अहमदपूर, चाकूर तालुक्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे. तालुक्यातील विविध ठिकाणी वीज उपकेंद्रांची कामे मंजूर आहेत. मात्र, अनेक कामे अद्यापही सुरु झालेली नाहीत. त्यामुळे शेतक-यांना अखंडित वीज पुरवठा होत नसल्याची बाब सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी यावेळी मांडली. अतिवृष्टी काळात अहमदपूर, चाकूर तालुक्यातील सिंचन तलावांचे सांडवे फुटले आहेत. या सांडव्याच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा. तसेच ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रातील आवश्यक सुविधांसाठीही निधी उपलब्ध करून द्यावा असेही सांगितले.