eknath shinde and devendra fadnavis with appasaheb dharmadhikari
मुंबई: ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना वर्ष 2022 चा महाराष्ट्र भूषण (Maharashtra Bhushan To Appasaheb Dharmadhikari) पुरस्कार देण्यात येणार असल्याचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी जाहीर केले. महाराष्ट्र भूषण निवड समितीने केलेल्या शिफारशीवर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी आज शिक्कामोर्तब केले. आज रेवदंडा येथे मुख्यमंत्र्यांनी आप्पासाहेबांची भेटही घेतली. समाजप्रबोधनात धर्माधिकारी घराण्याचं मोठं योगदान आहे. विशेषत: रायगड, ठाणे जिल्ह्यात त्यांचे अनुयायी मोठ्या संख्येनं आहेत.
पद्मश्री डॉ.दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा जन्म 14 मे 1946 रोजी झाला. गेली 30 वर्ष ते निरुपण करत असून अंधश्रध्दा,बालमनावर संस्कार करण्यासाठी त्यांनी विशेष बालसंस्कार बैठक सुरु केल्या. आदिवासी वाडी, वस्त्यांवर व्यसनमुक्तीचे मोठे कार्यही केले.
डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविले जातात. अलीकडच्या काळात संस्थेने सर्वाधिक प्रमाणात वृक्षारोपण केले. त्याशिवाय वृक्षसंवर्धन,तलाव व स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिराचे आयोजनही नियमितरीत्या करण्यात येते. गणेशोत्सव व नवरात्रौत्सवनंतर निर्माल्यातून खतनिर्मिती करून एक पर्यावरणपूरक संदेशही त्यांनी समाजाला दिला आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी हे स्वच्छतादूत म्हणूनही ओळखले जातात
रायगड जिल्ह्यातील रेवदंडामध्ये आप्पासाहेबांचे प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण झाले. बालपणापासून त्यांना कीर्तन ,भजन, अध्यात्मिक वाचन याची आवड होती. याशिवाय त्यांना मैदानी खेळ व पोहणेही आवडायचे. तळागाळातील प्रत्येक मनुष्यासाठी, समाजाच्या सेवेसाठी आप्पासाहेबांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले आहे. या कार्याची सुरुवात त्यांचे वडील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी ह्यांनी 1943 सालापासून केली होती आणि आज तेच कार्य, तेवढ्याच जोमाने, तत्परतेने जगभर पोहोचविण्याचे कार्य आप्पासाहेब धर्माधिकारी करत आहेत.
वडील नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांचे पुत्र आप्पासाहेब धर्माधिकारीही समाज प्रबोधनाच्या कार्यात अग्रेसर आहेत. अध्यात्म, पर्यावरण, व्यसनमुक्ती आणि आरोग्य क्षेत्रात धर्माधिकारी आणि त्यांच्या अनुयायांचं काम मोठ्या प्रमाणात आहे. राज्यात अनेक ठिकाणी वृक्षारोपण, रक्तदान शिबिरं, निशुल्क वैद्यकीय शिबीरे, रोजगार मेळावे, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती यात आप्पासाहेब धर्माधिकारी यांचं मोठं योगदान आहे. याआधी २०१७ साली त्यांना पद्मश्री या भारतीय नागरी सन्मानांही गौरवण्यात आलेलं आहे.